शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर याचं मातोश्रीसोबत भांडण झालं आहे की काय अशी शंका भाजपाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी उपस्थित केली आहे. नार्वेकर यांनी आज बाबरी मशीद पाडल्याच्या घटनेला २९ वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त एक ट्विट केलं आहे. या ट्विटच्या पार्श्वभूमीवर चंद्रकांत पाटील यांना प्रश्न विचारण्यात आला असता त्यांनी महाविकास आघाडीला टोला लगावला आहे.

नक्की वाचा >> बाबरी प्रकरण: “राम मंदिराच्या नावाने सत्तेत आलेल्या सरकारने बाळासाहेबांना ‘भारतरत्न’ पुरस्कार देऊन ऋणमुक्त व्हावं”

अयोध्येमधील राम मंदिर निर्माण करण्यासाठी शिवसैनिकांनी केलेल्या बलिदानाला कोटी कोटी प्रमाण असा मजकूर असणारा बाबरी मशिद पाडतानाचा जुना फोटो नार्वेरकांनी आज सकाळी सव्वा अकराच्या सुमारास ट्विट केलाय.

याच ट्विटबद्दल चंद्रकांत पाटील यांना पत्रकारांनी विचारलं असता आधी त्यांनी हे ट्विट आपण पाहिलं नसल्याचं सांगितलं. नंतर पत्रकारांनी ट्विटचा मजकूर सांगितल्यानंतर पाटील यांनी या ट्विटवरुन नार्वेकर, शिवसेना आणि महाविकास आघाडी अशा तिघांवरही निशाणा साधला. “मिलिंद नार्वेकरांनी हे ट्विट करणं म्हणजे महाविकास आघाडीच्या पायालाच सुरुंग लावणं आहे. धर्मनिरपेक्ष आणि अल्पसंख्यांकांचं लांगुनचालन यावरच महाविकास आघाडी आहे ना? यावरच महाविकास आघाडीचा मीनार उभा आहे. त्यांचं (नार्वेकरांचं) मातोश्रीशी भांडणं झालं की काय कळत नाही. त्यांनी असं ट्विट करणं हे त्यांच्या (महाविकास आघाडीच्या) पायाला सुरुंग लावण्यासारखं आहे,” असा टोला पाटील यांनी लगावला आहे.

“नार्वेकर म्हणजे नवे शिवसेनाप्रमुख ना?”
राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी आज महापरिनिर्वाण दिनानिमित्त पुण्यातल्या सिंबायोसिस संस्थेच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर संग्रहालय आणि स्मारकाला भेट देऊन अभिवादन केले. या कार्यक्रमामध्येही नारायण राणेंना नार्वेकरांच्या ट्विटबद्दल विचारण्यात आलं. त्यावर प्रतिक्रिया देताना राणेंनी, “नार्वेकर म्हणजे नवे शिवसेनाप्रमुख ना?” असा प्रतिप्रश्न केला.