भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आज माध्यमांशी बोलताना शिवसेनेवर निशाणा साधल्याचं दिसून आलं. यावेली त्यांनी शिवसेना नेते रामदास कदम यांनी दोन दिवसांपूर्वी घेतलेल्या पत्रकारपरिषदेवरून शिवसेनेला टोला लगावला.

रामदास कदम यांच्या रुपाने शिवसेनचा अंतर्गत वाद आता चव्हाट्यावर आलेला आहे, नेमकं शिवसेना कोण चालवतय असा प्रश्न देखील लोकांमध्ये उपस्थित होत आहे, असं माध्यम प्रतिनिधीने सांगितल्यानंतर यावर प्रतिक्रिया देताना चंद्रकांत पाटील म्हणाले की, “ही तर सुरूवात आहे. कारण मागील दोन वर्षांमध्ये संजय राऊतच सामनाचे संपादक, संजय राऊतच प्रवक्ते, संजय राऊतच सरकारचे प्रवक्ते, संजय राऊतच पक्षाचे प्रवक्ते म्हणजे सरकारसंबधी काही असेल तरी तेच बोलणार, केंद्रात सरकारविषयक काही बोलायचं तरी तेच बोलणार असं जवळजवळ सगळ्यांना नामशेष केलं आहे. पुन्हा एकदा, हा माझा विषय नाही. उद्या सामनात अग्रलेख येणार आहे, माझ्यावर आलेल्या अग्रलेखांचं एक पुस्तक छापण्याचा माझा विचार सुरू आहे. त्यामुळे उद्या अग्रलेख येणार आहे की आमचं तुम्हाला काय पडलंय आहे?

“अनिल परब म्हणजेच जर शिवसेना असेल तर…” ; रामदास कदम यांचं मोठं विधान!

तसेच ते पुढे म्हणाले की, “ पण मग रामदास कदमांनी आता विरोधाचा सुर लावला, पण गेली दोन वर्ष ते कुठे होते? त्यांना काहीही स्थान नव्हतं. दिवाकर रावते कुठे आहेत? अनिल देसाई कुठे आहेत? सुभाष देसाई, एकनाथ शिंदे कुठे आहेत? केवळ संजय राऊतच.” तर, “Only संजय राऊत माध्यमांसाठी आणि Only अनिल परब कारभारासाठी, यातली घुसमट ही बाहेरच पडेल. यावर संजय राऊत उद्या अग्रलेखात प्रश्न विचारतील की तुम्हाला आमच्या घरातलं काय पडलंय? आता तुम्ही (माध्यमांनी) प्रश्न विचारला म्हणून मी सांगितलं.”असंही यावेळी चंद्रकांत पाटील यांनी बोलून दाखवलं.

याचबरोबर, उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी असा आरोप केला आहे की, अमित शहा यांनी उद्योग गुजरातला पळवले आहेत. यावर उत्तर देताना चंद्रकांत पाटील म्हणाले की, “सुभाष देसाईंनी तशी यादी द्यावी. कोणते उद्योग पळवले आहेत.”

“तुकाराम सुपेंवर ‘मविआ’ सरकारचा वरदहस्त असल्याशिवाय…” ; चंद्रकांत पाटील यांचा आरोप

तसेच, सुभाष देसाई हे देखील म्हणाले की देवेंद्र फडणवीस यांचं नाव मुख्यमंत्रीपदासाठी ठरलेलं आता अमित शहा सांगत आहेत, यापूर्वी का नाही सांगितलं? असं माध्यम प्रतिनिधीने सांगितल्यावर चंद्रकांत पाटील म्हणाले, “अनेकदा सांगितलं. सांगण्याची सुरूवात प्रचाराच्या सभेच्या वेळी आहे. ज्या ज्या वेळी मोदींच्या सभेत उद्धव ठाकरे असायचे आणि बाकी खालपर्यंतच्या सभांमध्ये त्यांचे खालपर्यंतचे नेते असायचे, तेव्हा प्रत्येक वेळेला आजचे मुख्यमंत्री आणि भावी मुख्यमंत्री असाच देवेंद्र फडणवीस यांचा उल्लेख केला गेला. त्यामुळे त्यावेळा विरोध का नाही केला गेला? असा आमचा प्रश्न आहे. कुठल्यातरी सभेत सभा घेतल्यानंतर चहा घेताना का नाही विचारलं की मोदीजी आप ये क्या बोल रहे है? अमितभाई ऐसा कैसे चलेगा असं बोलायला हवं होतं? ”