राज्यातील पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांबाबतचा अहवाल लीक झाल्याप्रकरणात सायबर पोलिसांनी देवेंद्र फडणवीसांच्या घरी जाऊन त्यांची दोन तास चौकशी केली. या चौकशीचा भाजपाकडून तीव्र निषेध करण्यात येत असून राज्यभर फडणवीसांना आलेल्या नोटीसीची होळी करण्यात आली. या चौकशीनंतर देवेंद्र फडणवीसांनी माध्यमांशी बोलताना राज्य सरकारवर आणि पोलिसांवर गंभीर आरोप केले. अधिवेशनात सरकारचे घोटाळे उघड केल्यामुळेच आपल्याला चौकशीची नोटीस पाठवण्यात आल्याचा दावा फडणवीसांनी केला. यावर आता भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “देशातील लोकशाही संपलेली नाही. महाराष्ट्रातल्या १२ कोटी जनतेने दोन दिवस सुरु असलेला तमाशा पाहिलेला आहे. ज्या माणसाने अधिकाऱ्यांच्या बदल्यांमधील घोटाळ्याची माहिती गोळा केली आणि केंद्रीय गृहसचिवांना दिली त्यांनाच तुम्हाला माहिती कुठून मिळाली असे विचारले जात आहे. तुम्हाला याची माहिती मिळालेली नाही ते आधी बघा. विरोधी पक्षांना याचे स्वातंत्र्या आणि अधिकार असतो. लोकशाहीमध्ये सत्ताधारी पक्ष माजतो, नियंत्रणाच्या बाहेर जातो. अशावेळी विरोधी पक्षाने त्याच्यावर अंकुश ठेवायचा असतो. तो ठेवताना गोळा केलेली माहिती कुठून मिळाली हे सांगणे आवश्यक नसते. या गोंधळामध्ये देवेंद्र फडणवीसांना घेण्याचा प्रयत्न सुरु आहे. पण देवेंद्र फडणवीस पोहोचलेले खेळाडू आहेत,” असे चंद्रकांत पाटील यांनी म्हटले. “वर्षभरापासून तपास थांबल्याने…”; देवेंद्र फडणवीसांच्या चौकशीवर गृहमंत्र्यांची प्रतिक्रिया “तुम्ही प्रसाद लाड, प्रवीण दरेकर यांना अडकवण्याचा प्रयत्न केला. पण कोर्टाने त्यांना दिलासा दिला. देवेंद्र फडणवीस कोर्टाच्या विरोधात गेले नाहीत. गेल्या आठवड्यात त्यांनी जो पेन ड्राईव्ह बॉम्ब टाकला ते हिमालयाचे टोक आहे. सरकारला अजून नऊ दिवस अधिवेशन चालवायचे आहे. जरा जपून रहा,” असा इशारा चंद्रकांत पाटील यांनी दिला आहे. पगडीवरून वाद करणारे मूर्ख – चंद्रकांत पाटील पुण्यात झालेल्या कार्यक्रमात चंद्रकांत पाटील यांना फुले पगडी घालण्यात आली होती. दरम्यान यापूर्वी पुण्यात पगडी घालण्यावरुन वाद झाले. याबाबत चंद्रकांत पाटील यांना विचारले असता पगडीवरून वाद करणारे मूर्ख असतात अशी प्रतिक्रिया चंद्रकांत पाटील यांनी दिली. फुले पगडी मला प्रिय आहे. मला फार छान वाटतंय म्हणून मी पगडी काढली नाही. पगडीवरून वाद करणारे मूर्ख असतात. महान नेत्यांच्या कर्तुत्वाला सोडून पगडीवरून भांडत नसतात, असे चंद्रकांत पाटील म्हणाले. दरम्यान, दोन तासांच्या चौकशीनंतर देवेंद्र फडणवीसांनी माध्यमांशी संवाद साधताना राज्य सरकारवर आरोप केले. “मला नोटीस पाठवण्यामागचं कारण सभागृहात मी मांडत असलेले विषय आहेत. दाऊदसोबत सरकारच्या मंत्र्यांचं कनेक्शन किंवा विरोधी पक्षाबाबत सरकार करत असलेलं षडयंत्र हे विषय मी काढले. म्हणून अचानक अशी नोटीस मला देण्यात आली”, असं फडणवीस यावेळी म्हणाले.