चंद्रपुरमधील घुग्घुस येथील वेकोली रामनगर वसाहतीत राहणारा तरुण अभियंता शुभम फुटाणे (२५) याची अपहरण करून, २८ दिवसानंतर ३० लाखांच्या खंडणीसाठी जिवंत जाळून हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना आज (शनिवार) समोर आली आहे. याप्रकरणी घुग्घुस पोलिसांनी आरोपी गणेश पिंपळशेंडे याला अटक केली आहे.

शुभम फुटाणे हा १७ जानेवारी रोजी सायंकाळी ५ वाजता मित्रांसोबत हॉटेलमध्ये जेवायला जातोय, असे सांगून घराबाहेर पडला होता. त्यानंतर तो घरी परतलाच नाही. दरम्यान एका अज्ञात व्यक्तीने शुभमच्या आईला फोन करून, शुभमचे अपहरण केले असल्याची माहिती दिली होती. तसेच ३० लाखांची खंडणी देखील मागितली होती.
घटनेच्या दुसऱ्या दिवशी घुग्घुस येथील डॉ.दास यांच्या रूग्णालयाजवळ शुभमची मोटरसायकल आढळली होती. तेव्हापासून स्थानिक गुन्हेशाखेचे ठाणेदार बाळासाहेब खाडे, घुग्घुस पोलीस त्याचा शोध घेत होते. मात्र आज त्याच्या हत्येची माहिती समोर आल्याने एकच खळबळ उडाली. या प्रकरणी पोलिसांचा संशय एका व्यक्तीवर होता. त्याच्यावर पाळत ठेवली गेली. वाहनावरील रक्ताचे आणि आरोपीच्या रक्ताचे नमूने तपासले असता त्यात साम्य आढळले. आरोपीची चौकशी केली असता व घराची झाडाझडती घेतली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली.

ठाणेदार राहुल गांगूर्डे यांनी घुग्घुस लगतच्या स्वागत लॉन येथे आरोपी पिंपळशेंडे याला नेले असता शुभम फुटाणे याचा मृतदेह पूर्णपणे जळालेल्या अवस्थेत आढळून आला. अधिक तपासासाठी पोलिसांनी शुभमच्या डोक्याची कवटी हस्तगत केली आहे. तर, जाळून हत्या केल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. याप्रकरणी आणखी बरीच माहिती समोर येईल, असे घुग्घुस पोलिसांनी सांगितले आहे. मृतदेह जळालेल्या अवस्थेत मिळाला असून आरोपीला ताब्यात घेतले असल्याची माहिती उपविभागीय अधिकारी शिवंत नांदेडकर यांनी दिली.