करोना विषाणुच्या संसर्गामुळे बाधित झालेल्या व्यक्तींची संख्या मोठया’ प्रमाणात वाढत असल्याने आपात्कालीन परिस्थीती उद्भवू नये यादृष्टीने पुर्व तयारी म्हणून जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी जिल्ह्यातील सर्व व्यवस्थापनांच्या व सर्व माध्यमांच्या शाळेतील इयत्ता पाचवी ते नववी व इयत्ता अकरावीचे वर्ग तात्पुरते स्वरुपात दि. ५ एप्रिल ते ३० एप्रिल २०२१ या कालावधीकरीता बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

शाळा बंद असली तरी जिल्हयातील इयत्ता पहिली ते नववी व इयत्ता अकरावीचे वर्ग ऑनलाईन सुरु राहतील. तसेच इयत्ता दहावी व इयत्ता बारावीचे वर्ग कोव्हिड-19 च्या सर्व सुरक्षा विषयक नियमांचे पालन करुन पुर्वीप्रमाणेच सुरु राहतील. शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी नियमितपणे व आवश्यकतेनुसार शाळेत उपस्थित राहतील. शिक्षक शाळेत येऊन ऑनलाईन वर्ग घेतील, तसेच इयत्ता दहावी व इयत्ता बारावीच्या बोर्ड परोक्षेकरीता शासनाने वेळोवेळी दिलेल्या निर्देशानुसार काम करतील.

सर्व शाळांना कोव्हिड-19 च्या अनुषंगाने राज्य शासन व जिल्हा प्रशासनाने वेळोवेळी निर्गमित केलेल्या आदेशाचे पालन करणे बंधनकारक राहील. या आदेशाची कोणतीही व्यक्ती, संस्था आणि संघटना यांनी अंमलबाजवणी करण्यास टाळाटाळ केल्यास अथवा विरोध दर्शविल्यास संबंधितांविरुद्ध आपत्ती व्यवस्थापन कायदा, भारतीय दंड संहिता तसेच साथरोग कायदा अन्वये कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.