चंद्रपूर : करोना संक्रमण काळात टाळेबंदीमुळे सलग दोन वर्षे शहरातील प्रदूषण कमी होते. मात्र टाळेबंदी उठताच जानेवारी ते मे या पाच महिन्यांच्या कालावधीत चंद्रपूर शहरात ४५ दिवस चांगले तर ९८ दिवस प्रदूषणाचे होते. चंद्रपूर, ताडाळी, घुग्गुस आणि बल्लारपूर या औद्योगिक शहरात केवळ ३३ दिवस चांगले तर ११५ दिवस प्रदूषित होते. प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून प्रदूषण कमी होण्यासाठी काहीही प्रयत्न होत नसल्यामुळेच प्रदूषित दिवसांची संख्या अधिक असल्याचे दिसून येत आहे. चंद्रपूर शहर आणि परिसरातील प्रदूषणात पुन्हा सातत्याने वाढ होत आहे. चंद्रपूर २०२०-२०२१ दरम्यान कोविड टाळेबंदीनंतर चंद्रपूर शहरातील वायू प्रदूषणात पुन्हा वाढ होऊ लागली असल्याचे प्रदूषण मंडळांच्या जानेवारी ते मे २०२२ ह्या ५ महिन्यांच्या आकडेवारीवरून स्पष्ट होते. जानेवारी ते मे या १५१ दिवसात चंद्रपूर शहरात ४७ दिवस चांगले तर ९८ दिवस प्रदूषित होते. शहरालगतच्या औद्योगिक क्षेत्रात उन्हाळय़ातील १५१ दिवसात चांगले दिवस केवळ ३३ तर ११५ दिवस प्रदूषित होते. चंद्रपूर शहरातील प्रदूषणसंबंधी रोग आणि मृत्यूचे वाढते प्रमाण पाहता हे प्रदूषण कमी करणे अत्यंत गरजेचे असल्याचे मत पर्यावरण अभ्यासक आणि ग्रीन प्लानेट सोसायटीचे अध्यक्ष प्रा. सुरेश चोपणे ह्यांनी व्यक्त केले आहे. गेली दोन वर्षे करोनामुळे औद्योगिक आणि नागरी प्रदूषण कमी झाले होते. आता सर्व व्यवहार सुरू झाल्यामुळे प्रदूषणात वाढ होऊ लागली आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील चंद्रपूर, ताडाळी, घुग्गुस आणि बल्लारपूर हे ४ औद्योगिक क्षेत्र गेल्या १२ वर्षांपासून सतत अतिप्रदूषित क्षेत्र म्हणून जाहीर होत आहेत. अनेक कृती आराखडे आखले तरी प्रदूषणात फारसी सुधारणा नाही. आजही चंद्रपूरचा सेपी स्कोर (सीईपीआय) हा ७४.४१ असून तो महाराष्ट्रात दुसऱ्या क्रमांकावर आहे. जिल्ह्यातील उद्योग हे त्यांचे प्रदूषण मापन करतात, म.प्र.नि. मंडळ आणि के.प्र.नि. मंडळ स्वतंत्रपणे प्रदूषण मापन करतात. चंद्रपूर शहरात आणि खुटाळा औद्योगिक क्षेत्रात हवा प्रदूषण मापन यंत्रणा लावलेली आहे. हवा गुणवत्ता निर्देशांक ठरवताना कमीत कमी ३ आणि जास्तीत जास्त ६ प्रदूषकांचा समावेश होतो. चंद्रपूर शहराचे मागील ५ महिन्यांचे प्रदूषण निर्देशांक (एक्यूआय) पुढील प्रमाणे आहे. शहरातील नोंद झालेल्या प्रदूषण मापन केंद्राच्या २०२२ च्या आकडेवारीनुसार, जानेवारी महिन्यात चांगले दिवस १३ असून प्रदूषित दिवस १८ (त्यात अति प्रदूषित २ दिवस) होते. फेब्रुवारी महिन्यात चांगले दिवस १३ तर प्रदूषित दिवस १५. मार्च महिन्यात चांगले दिवस ६ तर प्रदूषित दिवस २५. एप्रिल महिन्यात ८ दिवस चांगले तर १७ दिवस प्रदूषित होते. मे महिन्यात ७ दिवस चांगले तर २३ दिवस प्रदूषित होते. मागील ५ महिन्यातीत एकूण १५१ दिवसात ४७ दिवस आरोग्यदायी तर ९८ दिवस प्रदूषित होते. उर्वरित दिवसांची आकडेवारी उपलब्ध नाही. औद्योगिक क्षेत्र खुटाळा येथे नोंदणी झालेले प्रदूषणाच्या आकडेवारीनुसार, जानेवारी महिन्यात १० दिवस चांगले तर २१ दिवस प्रदूषित (अतिप्रदूषित ३ दिवस), फेब्रुवारी महिन्यात २८ पैकी २७ दिवस प्रदूषित मार्च महिन्यात ३१ पैकी ३० दिवस प्रदूषित, एप्रिल महिन्यात १३ दिवस चांगले तर १७ दिवस प्रदूषित (अतिप्रदूषित ३ दिवस). मे महिन्यात १० दिवस चांगले तर २० दिवस प्रदूषित. खुटाळा परिसरातील गेल्या पाच महिन्यांतील एकूण १५१ दिवसांत ३३ दिवस चांगले तर ११३ दिवस प्रदूषित होते. उर्वरित दिवसांची आकडेवारी उपलब्ध नाही. घुग्घुस शहरात वाढीची भीती घुग्घुस हे या जिल्ह्यातील सर्वाधिक प्रदूषित शहर आहे. वेकोलीच्या कोळसा खाणी तथा लॉयड मेटल्स या उद्योगामुळे घुग्घुस शहरातील ९० टक्के लोक विविध आजाराने ग्रस्त आहेत. एसीसी सिमेंट कंपनीनेही या शहराच्या प्रदूषणात मोठी भर घातली आहे. आता तर लॉयड मेटल्स कंपनी प्रकल्पाचा विस्तार करत आहे. त्यामुळे या शहराच्या प्रदूषणात अतिशय वाईट पध्दतीने वाढ होणार आहे. तेव्हा स्थानिक लोकप्रतिनिधी आणि लोकांनी जनसुनावणीत विस्तारीकरणाला विरोध करायला हवा होता. मात्र एकानेही जनसुनावणीत विरोध केला नाही. परिणामी, आता येथे प्रकल्प उभा राहणार आहे. त्यामुळे प्रदूषणाचा धोका आणखी वाढला आहे. चंद्रपूर शहरातील प्रदूषणाला पेट्रोल, डिझेलची वाहने, रस्त्यावरील धूळ, कचरा ज्वलन, कोळसा ज्वलन, बांधकामे आणि काही प्रमाणात थर्मल पॉवर स्टेशनची धूळ कारणीभूत आहे. यासाठी नागरिकांनी पुढाकार घेऊन प्रयत्न केले तर प्रदूषण कमी होऊ शकते. त्यासाठी बॅटरीवर चालणारी वाहने आणि सायकलचा वापर, रस्ते सफाई मशीनचा वापर, रस्त्यावरील बांधकामे, वाळू मातीला बंदी, शहरात कचरा व कोळसा न जाळने, थर्मल पॉवर स्टेशनच्या जुन्या सर्व संचात सुधारणा करणे इत्यादी उपाययोजना केल्यास हे प्रदूषण कमी होऊ शकेल. - सुरेश चोपणे, अध्यक्ष, ग्रीन प्लानेट सोसायटी, चंद्रपूर.