संगमनेर : ऑक्टोबर २०२२ मध्येच कालव्यांद्वारे पाणी देण्यासाठी निळवंडे कालव्यांचे काम आपण रात्रंदिवस सुरू ठेवले होते. परंतु सरकार बदलले आणि काम थंडावले आहे. मात्र कोणी कितीही अडचणी आणल्या तरी पाणी येणारच आहे. कार्यक्षेत्रात एकरी ऊस उत्पादन वाढवणे अत्यंत गरजेचे असून तालुक्यातील सहकारी संस्था,कारखाना यामुळे तालुक्यातील आर्थिक समृद्धीसह प्रत्येक कुटुंबात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असल्याचे प्रतिपादन काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी केले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या सन २०२२-२३ गळीत हंगामाच्या सांगता समारंभ प्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी कारखान्याचे अध्यक्ष बाबासाहेब ओहोळ होते. व्यासपीठावर माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, आमदार सत्यजित तांबे, कांचनताई थोरात, दुर्गाताई तांबे, बाजीराव खेमनर, रणजितसिंह देशमुख, लहानुभाऊ गुंजाळ, आर.बी. राहणे, सोमेश्वर दिवटे, संतोष हासे, इंद्रजित थोरात, रमेश गुंजाळ, गणपतराव सांगळे, संपतराव डोंगरे, रामहरी कातोरे, हौशीराम सोनवणे, निर्मला गुंजाळ, सुनंदा जोर्वेकर,घुलेवाडीच्या सरपंच निर्मला राऊत, कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर आदी उपस्थित होते.

थोरात म्हणाले,की संगमनेर तालुका हे एक कुटुंब आहे. सहकारी संस्था आणि कारखान्यामुळे प्रत्येक कुटुंबात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. कारखान्याने यावर्षी अनेक अडचणींवर मात करून १० लाख मेट्रिक टनावर यशस्वी गाळप केले आहे. मात्र कार्यक्षेत्रात एकरी जास्तीत जास्त ऊस उत्पादन वाढेल यासाठी काम केले पाहिजे. निळवंडे धरण अनेक अडचणीवर मात करून आपण पूर्ण केले. सहकारी संस्थांमुळे तालुक्यात समृद्धी आली असून वैभवशाली व प्रगतशील तालुक्यांमध्ये संगमनेर तालुक्याचा नंबर राज्यातील पहिल्या पाच तालुक्यांमध्ये लागतो.

सुसंस्कृत व बंधुभावाचे राजकारण, ज्येष्ठांचा सन्मान ही आपल्या तालुक्याची परंपरा असून सर्वानी तालुक्याच्या विकासासाठी एकत्र येऊन काम केले पाहिजे. संगमनेरचा सहकार, शिक्षण, संस्था,व्यापार, शेती हे अत्यंत चांगले असून या चांगल्या कामाचा अभिमान बाळगताना सर्वानी चांगल्या कामाच्या पाठीशी उभे राहावे, असे आवाहनही त्यांनी केले.

माजी आमदार डॉ. तांबे म्हणाले,की बिनचूक आणि निर्विघ्नपणे कारखान्याचा यशस्वी  हंगाम पार पाडला आहे. यामध्ये कारखान्याच्या सर्व व्यवस्थापनाचा मोठा सहभाग असून शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त ठिबक सिंचन पद्धतीचा अवलंब करताना शेतीमध्ये नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर केला पाहिजे. सहकारातूनच समाजाचे हित होत असल्याने सहकार चळवळ प्रत्येकाने जपली पाहिजे असेही ते म्हणाले. आमदार सत्यजित तांबे म्हणाले,की काँग्रेस नेते आमदार बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेर तालुक्याची यशस्वी वाटचाल सुरू असून  उपपदार्थ निर्मिती बरोबर आगामी काळात इथेनॉल निर्मितीमध्ये  साखर कारखान्याला मोठी संधी असल्याचे ते म्हणाले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर यांनी केले. सूत्रसंचालन नामदेव कहांडळ यांनी केले तर संतोष हासे  यांनी आभार मानले.

कामगारांना वेतनफरक ४ कोटी २१ लाख

थोरात कारखान्याने सभासद, शेतकरी, ऊस उत्पादक यांच्याबरोबरच कामगारांचे हित जोपासताना अनेक दूरदृष्टीचे निर्णय घेतले आहेत. यावर्षीही वेतन फरकापोटी ४ कोटी २१ लाख रुपये देण्याचा निर्णय आमदार बाळासाहेब थोरात यांनी जाहीर केला. सर्व कामगारांनी टाळय़ांच्या कडकडाटात या निर्णयाचे स्वागत केले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Change of government work on nilvande canals work stop balasaheb thorat ysh
First published on: 31-03-2023 at 00:36 IST