पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या नाशिक दौऱ्यावरुन अन्न नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी शिवसेनेवर टीका केली आहे. शिवसेना विकास कामांचे श्रेय घेत असल्याचे मंत्री भुजबळ  यांनी म्हटले आहे. आदित्य ठाकरेंनी सुद्धा आधी चौकशी करावी असेही छगन भुजबळ म्हणाले. माध्यमांशी संवाद साधताना भुजबळ यांनी याबाबत भाष्य केले आहे.

“आदित्य ठाकरेंनी सुद्धा आधी चौकशी करावी. कारण काल ज्या ठिकाणी बोर्ड लावण्यात आले ते काम आधीपासून सुरु आहे. काम सुरु झाल्यावर तिथले एक दोन लोक काही तरी सांगतात. त्याच्यानंतर आदित्य ठाकरेंना सांगितल्यावर ते इथे येतात. यात त्यांची काही चूक नाही. काम सुरु झालेले असते पण नंतर दाखवायचे की हे काम शिवसेनेने केले. हे बरोबर नाही. यामुळे जिल्हा प्रशासन, ग्राम विकास खाते काहीच काम करत नाही का असा त्याचा अर्थ होतो,” असे छगन भुजबळ म्हणाले.

आदित्य ठाकरे सध्या नाशिक जिल्ह्यातील अतिदुर्गम भागांना भेट देऊन तिथल्या नागरिकांच्या समस्या जाणून घेत आहेत. विविध ठिकाणी सुरु असलेल्या विकास कामांचा आराखडा आदित्य ठाकरे शिवसेना नेत्यासोबत घेत आहेत. पाणी टंचाईमुळे त्रस्त असलेल्या नागरिकांना लवकरच पाणी पुरवण्यात येईल असेही आश्वासन आदित्य ठाकरे यांनी दिले.

नाशिक जिल्ह्यातील आदिवासी बांधवांसोबतही संवाद साधून आदित्य ठाकरेंनी त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. या वेळी पाणीपुरवठा योजना, सिंचन व पर्यावरणाच्या बाबतीत आढावा घेऊन प्रस्तावित नळपाणी पुरवठा योजनेच्या कामाला गती देण्याच्या सूचना देऊन वर्षभरात योजनेचे काम पूर्ण करण्याचे आदेश आदित्य ठाकरे यांनी दिले आहे.