महाराष्ट्र सरकार हे बिनकामाचं आणि नपुंसक आहे हे मी म्हणत नाही तर कोर्टाने म्हटलं आहे तसंच जनताही म्हणते आहे. जेव्हापासून हे सरकार स्थापन झालं आहे तेव्हापासून या सरकावर टीका करणाऱ्या अनेक उपाध्या लागल्या आहेत असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे. तसंच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबाबतही त्यांनी भाष्य केलं आहे. देशाच्या सर्वोच्च न्यायालयाने या महाराष्ट्र सरकारला नपुंसक म्हटलं आहे यावरून या सरकारची पत काय आहे? ते लक्षात येतं असंही संजय राऊत यांनी म्हटलं आहे.
मुख्यमंत्री रोज स्वतः गुलाम असल्यासारखे वागत आहेत
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे रोज गुलाम असल्यासारखे वागत आहेत. आपण गुलाम आहोत याची जाणीव ते रोज स्वतःलला करून देत आहेत. बसू का? खाऊ का? वाचू का? डोळे उघडू का? डोळे मिटू का? हे मुख्यमंत्री विचारतात. याच गोष्टीला सर्वोच्च न्यायालयाने नपुंसक म्हटलं आहे. महाराष्ट्रात विविध कारणांमुळे जातीय तेढ वाढावी, दंगली व्हाव्यात, राज्यातलं वातावरण अस्थिर रहावं असं काम हे सरकार करतं आहे असाही आरोप संजय राऊत यांनी केला आहे.
देवेंद्र फडणवीस यांच्याबाबत काय म्हणाले संजय राऊत?
गृहमंत्री किंवा गृहमंत्रालय महाराष्ट्रात अस्तित्त्वात आहे का? हाच प्रश्न आहे. देवेंद्र फडणवीस अत्यंत निराश आणि वैफल्यग्रस्त अवस्थेत काम करत आहेत. याची कारणं शोधावी लागतील. ती कारणं जाहीरपणे सांगण्यासारखी नाहीत. त्यांच्या चेहऱ्यावरच निराशा दिसून येते. बुधवारीही संभाजी नगरला जी परिस्थिती निर्माण झाली ही सरकारचं अपयश आहे. महाराष्ट्रात असं वातावरण निर्माण व्हावं ही या सरकारची इच्छा आहे. त्यासाठी मिंधे गटाच्या अनेक टोळ्या काम करत आहेत. असाही आरोप संजय राऊत यांनी केला.
दरम्यान, काल विद्वेषयुक्त भाषणांविरुद्ध गुन्हे नोंदवण्यात आले नसल्याचा आरोप करत महाराष्ट्रासह अन्य काही राज्यांच्या प्रशासकीय यंत्रणांविरोधात दाखल अवमान याचिकांवर सुनावणी झाली. यावेळी न्यायालयाने महाराष्ट्र सरकारच्या कार्यपद्धतीवर ताशेरे ओढले. यावरूनही संजय राऊतांनी शिंदे-फडणवीस सरकारला लक्ष्य केलं. “सर्वोच्च न्यायालयाने शिंदे सरकारला नपुंसक म्हटलं आहे. यापूर्वी न्यायालयाने कधीही कोणत्याही सरकारविरोधात असा शब्द वापरला नाही. आम्ही सातत्याने म्हणतो आहे, की राज्यात सरकारच अस्त्वित्वात नाही.महाराष्ट्रात जातीय तणाव वाढावा, यासाठी हे सरकार प्रयत्न करत आहेत”, असे ते म्हणाले.