मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोमवारी (१२ सप्टेंबर) औरंगाबादमधील पैठणच्या सभेत पुन्हा एकदा शिवसेनेतील बंडखोरीवर भाष्य केलं. “एखादा ग्रामपंचायत सदस्य किंवा नगरसेवकदेखील असा निर्णय घेताना फार विचार करतो. इकडे ५० आमदारांनी निर्णय घेतला. हा देशातील नाही, तर जगातील मोठा इतिहास आहे,” असं मत एकनाथ शिंदेंनी व्यक्त केलं.
“संदीपान भुमरे जसं बोलतात तसं धाडस करतील का असं वाटलं, पण…”
एकनाथ शिंदे म्हणाले, “मला तेव्हा वाटलं संदीपान भुमरे जसं बोलतात तसं धाडस करतील का, पण मी पाहिलं जबरदस्त धाडसी माणूस निघाला. दिलेला शब्द पाळणारा माणूस निघाला. लढाई तशी सोपी नव्हती. तुम्ही सगळे टीव्ही चॅनलवर बघत होता. काय होईल, काय होईल, काय होईल? अशी स्थिती होती. सगळेजण आपला कार्यक्रम करण्याच्या तयारीत होते. सगळ्यांनीच आपला कार्यक्रम करायचं ठरवलं होतं, परंतु माझ्याबरोबर असणारे ५० लोक त्यांना पुरून उरले.”
“हा देशातील नाही, तर जगातील मोठा इतिहास”
“सत्ताधारी पक्ष एकीकडे, यंत्रणा एकीकडे आणि आम्ही दुसरीकडे होतो. लोक विरोधी पक्षातून सत्तेकडे जातात, परंतु आम्ही सत्तेतून पायउतार झालो आणि विरोधकांकडे गेलो. माझ्यासोबत आठ-नऊ मंत्री होते, ५० आमदार होते. एखादा ग्रामपंचायत सदस्य किंवा नगरसेवकदेखील असा निर्णय घेताना फार विचार करतो. इकडे ५० आमदारांनी निर्णय घेतला. हा देशातील नाही, तर जगातील मोठा इतिहास आहे,” असं एकनाथ शिंदेंनी म्हटलं.
“मुस्कटदाबी झाली, तेव्हा संदीपान भुमरे माझ्याकडे आले”
ते पुढे म्हणाले, “संदीपान भुमरेदेखील तसेच आहेत. एकदा ते माझ्याकडे आले, कधी आले ते मी सांगत नाही. शहाजीबापू म्हणाले आम्ही सगळे एकनाथ शिंदेंकडे गेलो आणि त्यांनी आम्हाला नेलं नाही, तर आम्हीच त्यांना नेलं. ही वस्तूस्थिती आहे. जेव्हा अन्याय झाला, मुस्कटदाबी झाली, तेव्हा संदीपान भुमरे आले आणि म्हणाले काय करायचं? मी म्हटलं काय करायचं, चाललंय ते चालू द्या.”
हेही वाचा : सभेत गर्दी जमवण्यासाठी पैसे वाटपाचा गंभीर आरोप, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…
“तर पुढच्या निवडणुकीत हाताच्या बोटाएवढेही आमदार येणार”
“यावर भुमरे म्हणाले असंच चाललं तर पुढच्या निवडणुकीत हाताच्या बोटाएवढेही आमदार येणार नाहीत. मी म्हटलं मी ठीक आहे, मला काहीच अडचण नाही. त्यावर म्हणाले, तुम्हाला अडचण नाही, पण सर्व आमदारांना अडचण आहे, जनतेला अडचण आहे,” असं एकनाथ शिंदेंनी सांगितलं.