शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदेंमधील वाद दिवसेंदिवस वाढत जाताना दिसत आहे. बंडखोरी केल्यानंतर शिंदे गट आणि शिवसेनेच्या नेत्यांमध्ये खटके उडत आहेत. दोन्ही गटाकडून आरोप-प्रत्यारोप सुरुच आहेत. पुन्हा एकदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंवर अप्रत्यक्षपणे निशाणा साधला आहे. " कुणालातरी माफ करणे ही साधी गोष्ट नाही. क्षमा करण्यासाठी मोठं मन हवं", असा टोला त्यांनी उद्धव ठाकरेंना अप्रत्यक्षपणे लगावला आहे. भारतीय जैन महामंडळाचा विश्वमैत्री दिवस कार्यक्रमात त्यांनी हे विधान केलं आहे. यावेळी मुख्यमंत्र्यांसह राज्यपाल भगतसिंह कोश्यारीही उपस्थित होते. हेही वाचा- “मुख्यमंत्री होऊन अवघे काही दिवस झाले पण…” राज्यपाल भगतसिंह कोश्यारींनी एकनाथ शिंदेंवर उधळली स्तुतीसुमनं काय म्हणाले एकनाथ शिंदे? "कष्ट करा काहीही करा पण नशिबाची साथ नसेल तर काहीच होत नाही. पण कष्ट करण्याचं काम आपलं आहे. ते तर करावंच लागेल. नाहीतर नशिबात सगळं आहे. मात्र, कष्ट नाही केले तर काहीच होणार नाही, नुसतं घरी बसून काहीच होत नाही," असं एकनाथ शिंदे म्हणाले. तसेच कुणालातरी माफ करणे ही साधी गोष्ट नाही, त्यासाठी मोठं मन लागतं असा टोलाही शिंदेंनी अप्रत्यक्षपणे उद्धव ठाकरेंना लगावला आहे. हेही वाचा- “मुख्यमंत्री होऊन अवघे काही दिवस झाले पण…” राज्यपाल भगतसिंह कोश्यारींनी एकनाथ शिंदेंवर उधळली स्तुतीसुमनं दसरा मेळाव्यावरुन शिवसेना शिंदे गटात रस्सीखेच दसरा मेळाव्यावरून राजकारण चांगलंच तापलं आहे. दसरा मेळाव्यावरून शिंदे गट आणि शिवसेना आमने-सामने आले आहेत. दोन्ही गटाकडून दसरा मेळाव्यासाठी शिवाजी पार्कची मागणी करण्यात आली होती. मात्र, अद्यापही यावर तोडगा निघालेला नाही. तर दुसरीकडे आता बीकेसीतील मैदानावर शिंदे गटाचा दसरा मेळावा होणार असल्याची माहिती मिळत आहे. दसरा मेळाव्यासाठी शिंदे गटाचा अर्ज महापालिकेने स्विकारला आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार शिवसेनेनेही दसरा मेळाव्यासाठी बीकेसीतील मैदानाची मागणी केली होती. मात्र, महापालिकेकडून शिवसेनेचा अर्ज फेटाळण्यात आला आहे. शिवाजी पार्कवर यंदा दसरा मेळावा होणार की नाही? झाल्यास कोणाचा होणार हे अद्यापही स्पष्ट होऊ शकलेलं नाही. शिवाजी पार्कबाबत मुंबई महापालिका काय निर्णय घेणार याकडे आता सगळ्यांच लक्ष लागलं आहे.