राज्यात एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन झाल्यापासून शिवसेना आणि शिंदे गट यांच्यातील वितुष्ट मोठ्या प्रमाणावर वाढलं आहे. एकमेकांवर कुरघोडी करण्याची एकही संधी दोन्ही बाजूंनी सोडली जात नाही. वेदान्त-फॉक्सकॉन प्रकल्प राज्याबाहेर गेल्यावरूनही शिवसेनेनं सत्ताधाऱ्यांना आणि विशेषत: शिंदे गटाला लक्ष्य केलं आहे. या पार्श्वभूमीवर बंडखोरी करण्याची वेळ शिंदे गटावर का आली? यासंदर्भात अजूनही चर्चा होत असताना त्यावर आता खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीच खुलासा केला आहे. ‘लोकसत्ता’ला दिलेल्या मुलाखतीमध्ये शिवसेना आणि भाजपा यांच्यातील संबंधांबाबत बोलताना एकनाथ शिंदेंनी मोठा गौप्यस्फोट केला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

“२०१४ ला युती तुटणं दुर्दैवी”

२०१४ च्या विधानसभा निवडणुकांपूर्वी भाजपा-शिवसेना युती तुटू नये असं आपलं मत होतं, असं शिंदे यावेळी म्हणाले. “२०१४ च्या लोकसभा निवडणुकीत आमची युती होती. विधानसभेच्या वेळी काही जागांच्या वाटपावरून युती तुटली. ती कायम राहावी या मताचा मी होतो. पण दुर्दैवाने युती होऊ शकली नाही. शिवसेना व भाजप स्वतंत्रपणे लढले. पण नंतर दोघांना एकत्र येण्याशिवाय पर्याय नव्हता. मी तेव्हा विरोधी पक्षनेता होतो. युतीसाठी प्रयत्न झाले, ते यशस्वी झाले आणि आम्ही सरकार बनवले”, असं ते म्हणाले.

तेव्हाच उपमुख्यमंत्रीपद मिळालं असतं?

दरम्यान, यावेळी बोलताना एकनाथ शिंदेंनी २०१४च्या निवडणुकांवेळच्या घडामोडींविषयी खुलासा केला आहे. “२०१४लाच भाजपानं शिवसेनेला उपमुख्यमंत्रीपद देऊ केलं होतं. भिवंडीत झालेल्या एका कार्यक्रमात देवेंद्र फडणवीस स्वत: मला म्हणाले होते की तुमच्याकडे नवीन जबाबदारी येणार आहे. पण मला माहिती होतं की शिवसेना हे पद स्वीकरणार नाही. तेव्हा उपमुख्यमंत्रीपद स्वीकारलं असतं, तर ते मला द्यावं लागलं असतं. त्यामुळेच ते पद तेव्हा शिवसेनेनं नाकारलं”, असं एकनाथ शिंदे म्हणाले.

२०१९लाही मुख्यमंत्रीपद हुकलं?

२०१९ला शिवसेना आणि भाजपाची युती तुटल्यानंतर महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झालं आणि उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले. पण एकनाथ शिंदेंच्या बंडखोरीनंतर ‘विचारलं असतं तर शिंदेंनाही मुख्यमंत्रीपद दिलं असतं’ असा दावा शिवसेनेकडून करण्यात आला. पण २०१९च्या निवडणुकांमध्येही मुख्यमंत्रीपद शिवसेनेकडे येऊ शकलं असतं, या चर्चेवर एकनाथ शिंदेंनी आपली भूमिका मांडली. “जर तरला काही अर्थ नाही. पण महाविकास आघाडी स्थापन करण्यास माझाही विरोध होता. तो मी नेतृत्वाच्या कानावर घातला होता”, असं ते म्हणाले.

“…हे विसरलात काय आदित्यजी? सरकार गेल्यामुळे एवढे विमनस्क झालात?”, चंद्रकांत पाटलांचा खोचक टोला!

“आम्ही केलेला हा कार्यक्रम…”

“असा निर्णय घेताना फार विचार लागतो. हे काही छोटं काम नाही. आम्ही केलेला हा मोठा कार्यक्रम आहे. ही वेळ का आली? एवढ्या मोठ्या प्रमाणावर असंतोष का निर्माण झाला? याचं कारण एका दिवसात तयार झालेलं नाही. जेव्हा राजकारणात एखाद्याच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण होतो, एखादा पक्ष किंवा पक्षाचा नेता देव्हा याकडे दुर्लक्ष करतो, तेव्हा अशा मोठ्या घटना घडतात”, असंही शिंदे यावेळी म्हणाले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Cm eknath shinde reveals shivsena offered deputy cm post by bjp devendra fadnavis in 2014 pmw
First published on: 25-09-2022 at 11:25 IST