Eknath Shinde Speech in Khed Rally: दोन आठवड्यांपूर्वी ५ मार्च रोजी उद्धव ठाकरेंनी खेडमधील सभेमधून शिंदे गटावर आणि भाजपावर परखड शब्दांत हल्लाबोल केला होता. त्यानंतर आता पुन्हा खेडमधल्या त्याच गोळीबार मैदानावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी जाहीर सभा घेतली असून या सभेच्या अनुषंगाने दोन्ही गटांमध्ये आरोप-प्रत्यारोप झाल्याचं पाहायला मिळालं. त्यामुळे आज एकनाथ शिंदे उद्धव ठाकरेंना कशा प्रकारे प्रत्युत्तर देणार याबद्दल कमालीची उत्सुकता राजकीय वर्तुळात पाहायला मिळाली.
Already have an account? Sign in
दरम्यान, यावेळी बोलताना एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंवर जोरदार हल्लाबोल केला.
CM Eknath Shinde Speech in Khed: उद्धव ठाकरेंची सभा झालेल्या मैदानावरच एकनाथ शिंदेंची जाहीर सभा!
एकनाथ शिंदे म्हणतात, “…एवढं करून तुम्ही आम्हाला गद्दार म्हणता? खोके म्हणता? पण मी कधीही आरोपाला आरोपाने उत्तर देत नाही!”
एमएमआरडीएच्या धर्तीवर कोकणासाठी मोठं प्राधिकरण करण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे. योगेश कदमचं प्रेम सगळ्यांनी पाहिलं आहे. त्यामुळे त्याला पाडण्याची हिंमत कुणामध्ये नाहीये. तो पुढच्या दीड वर्षांत एवढं काम करेल, की समोरच्या सगळ्यांचं डिपॉझिट जप्त होईल – एकनाथ शिंदे
माझ्याकडे खूप काही आहे. पण मी बोलत नाही याचा अर्थ मला काही माहिती नाही असा कुणी घेऊ नये. सहन करण्याचीही एक मर्यादा असते. त्यापलीकडे माणूस गेल्यानंतर सगळे बांध तुटून जातात. ती वेळ आमच्यावर आणू नका एवढंच सांगतो – एकनाथ शिंदे
२०१९च्या निवडणुकीवेळी कोविड नव्हता. माझी आई रुग्णालयात उपचार घेत होती. मी पालघरला राजेंद्र गावितांच्या प्रचारासाठी निघालो होतो. मला डॉक्टरचा फोन आला. माझ्या मनात शंकेची पाल चुकचुकली. गावित मला म्हणाले की माझी सगळी तयारी झाली आहे. सभेला जाणं आवश्यक आहे. मी डॉक्टरला सांगितलं की संध्याकाळी येतो. आई जवळपास गेली होती. पण मी राजेंद्र गावितांची सभा सोडून आलो नाही. त्याची सभा पूर्ण करून रुग्णालयात पोहोचलो. असं काम केलं. हा आमचा गन्हा आहे? ते कर्तव्य पार पाडलं, हा आमचा गुन्हा आहे? कोविडमध्ये पीपीई किट घालून रुग्णालयात गेलो हा आमचा गुन्हा आहे? घरात बसून आदेश देण्याचं काम आम्ही केलं नाही. रस्त्यावर उतरून लोकांना मदत केली. या एकनाथ शिंदेला दोनदा करोना झाला. पण हा एकनाथ शिंदे मागे हटला नाही. तुम्हा आम्हाला गद्दार म्हणता? खोके म्हणता? मी कधीही आरोपाला आरोपाने उत्तर देत नाही – एकनाथ शिंदे
मंडणगडला एमआयडीसीची मागणी आहे. तातडीने एमआयडीसी करण्याचा निर्णय घेतला जाईल. तिथेही लोकांना रोजगार मिळेल. हे सरकार घेणारं नाही, घेणारं नाही. हा मुख्यमंत्री देणारा आहे. देत देत आला आहे – एकनाथ शिंदे
कोकणात काजू-आंबा प्रक्रिया केंद्र उभारण्यासाठी ४ वर्षांसाठी १३७५ कोटींची तरतूद केली आहे. सिंधुदुर्गात मालवण-वेंगुर्ल्यात मार्केटिंग आणि ब्रँडिंगला आपण प्रोत्साहन देतोय. चक्रीवादळ आल्यानंतर विद्युत पोल, ओव्हरहेड लाईन तुटून पडतात त्यासाठी मदत-पुनर्वसनमधून २ हजार कोटींची तरतूद करण्यात आली आहे. मच्छिमार बांधवांना दिलासा देण्यासाठी सरकारनं मोठा निर्णय घेतला आहे. काही देश पर्यटनावर चालतात. ज्या ज्या ठिकाणी रस्त्यांचं काम प्रलंबित आहे, तिथे मे पर्यंत एक लाईन आणि संपूर्ण रस्ता डिसेंबरपर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश दिले आहेत – एकनाथ शिंदे
रामदास कदम मंत्री असल्यापासून एकच धोशा होता की समुद्रात वाहून जाणाऱ्या कोयनेच्या पाण्याचं काय. त्यावर आपण लवकरच निर्णय घेऊ. योगेश कदम पाठपुरावा करतायत तो खेड पोयनार प्रकल्पाला आपण मंजुरी दिली आहे. २४३ कोटींचा हा प्रकल्प आहे. न्यू मांडवेच्या प्रकल्पाबाबतही माझी चर्चा झाली आहे. तो प्रकल्पही तातडीने मंजूर केला जाईल. त्याबरोबर लघु आणि मध्यम प्रकल्पांचं पुनरुज्जीवन करायला हवं. रखडलेल्या सिंचन प्रकल्पांचं पुनरुज्जीवन केलं जाईल. त्याला पैसे कमी पडू दिले जाणार नाहीत. ४३ कोटींची खेड नळपाणी योजना आपण मंजूर केली आहे. मरीन पार्क आपण मंजूर करत आहोत. कुणबी भवनासाठी २ कोटी, अल्पसंख्याक सामाजिक भवन २ कोटी याला मी मान्यता देतो. – एकनाथ शिंदे
हा अर्थसंकल्प गाजराचा हलवा दिला अशी टीका केली. पण अरे आम्ही गाजराचा हलवा तरी दिला. तुम्ही तर फक्त गाजरं हलवून दाखवत राहिलात – एकनाथ शिंदे
सरकारनं घेतलेल्या निर्णयांची जंत्री वाचायला गेलं, तर एक तास लागेल – एकनाथ शिंदे
रामदास कदम म्हणाले की हा झोपतो कधी, उठतो कधी, जेवतो कधी. आता जास्त काम करावं लागतं. मी रात्री १२-१ वाजताही अधिकाऱ्यांना फोन करतो. तेही फोन उचलतात. कारण त्यांना माहिती आहे की हा मुख्यमंत्री रात्रीचा जागतो. आता सायलेंट सरकार नाही, अलर्ट सरकार आहे. सगळे अलर्ट मोडवर आहे – एकनाथ शिंदे
ते म्हणतात याला फिरायला वेळच मिळतो. हा दिल्लीच्या वाऱ्या करतो. मी फिरणाराच मुख्यमंत्री आहे. मला घरात बसायला आवडत नाही. मला फिरायला आवडतं. मी दिल्लीला जातो. तिथे जाऊन महाराष्ट्रासाठी हजारो कोटी रुपये आपण आणले. दावोसला आपण गेलो, तेव्हा तुमच्या मुख्यमंत्र्यानं १ लाख ३७ कोटींचे एमओयू साईन केले – एकनाथ शिंदे
ही सोन्यासारखी माणसं मला भेटायला येतात, तर त्यांना मी एक कप चहा पाजू शकत नाही? त्याचाही तुम्ही हिशोब काढता? अडीच वर्षं वर्षा बंदच होतं. पण आता हे वर्षा सगळ्यांसाठी खुलं आहे. हे वर्षा तुमचं आहे. मी कधीच मुख्यमंत्रीपदाचा मोह केला नाही. मला तर माहितीच नव्हतं की मी मुख्यमंत्री होणार आहे – एकनाथ शिंदे
माणसाला स्वत:च्या नेतृत्वावर विश्वास असायला हवा. किती लोक घालवलेत. नारायण राणे, राज ठाकरे, गणेश नाईकांपासून सगळे गेले. रामदास कदम, मलाही तुम्ही असंच केलं. जेव्हा स्वार्थ डोक्यात जातो, सत्तेची हव्यास जाते तेव्हा त्याला काहीह दिसत नाही, सुचत नाही. हा एकनाथ शिंदे आज, काल आणि उद्याही कार्यकर्ता म्हणूनच काम करणार – एकनाथ शिंदे
तुम्ही सगळ्यांना सांगितलंत की दरवाजे उघडे आहेत. उघडेच ठेवा. सगळे निघून जातील. शेवटी तुम्हीच राहाल. हम दो, हमारे दो. माझं कुटुंब माझीच जबाबदारी – एकनाथ शिंदे
रामदास कदम, गुलाबराव पाटलांच्या भाषणाला टाळ्या पडतात म्हणून त्यांची भाषणं तुम्ही बंद करता, आवाज बंद करता? कार्यकर्ता मोठा तर पक्ष मोठा – शिंदे
राज ठाकरे काय म्हणत होते? जिथे शिवसेना कमजोर आहे,. तो भाग मला द्या. मी शिवसेना वाढवतो., मोठी करतो. नारायण राणेंच्या बाबतीत काय झालं याचेही आम्ही सगळे साक्षीदार आहोत. आता तर आम्हाला सगळे भेटतात. बोलतात. पूर्वी आमच्यावर बंधनं होती, आता आम्ही मोकळे आहोत. ठाण्याच्या महापौरपदाची निवडणूक होती, तेव्हा मी राज ठाकरेंना सांगितलं की हा भगवा उतरू देऊ नका. राज ठाकरेंनी विनंती मान्य केली आणि आम्हाला पाठिंबा दिला. आमचं काय चुकलं? पण तेही तुम्हाला पटलं नाही. शेवटी बाळासाहेबांनी सांगितलं की हा एकनाथ स्वत:साठी गेला नाही, ठाण्यातला भगवा उतरू नये म्हणून गेला. कसा पक्ष पुढे जाणार? – शिंदे
बाळासाहेब असते, तर मनोहर जोशाींबद्दल असं केलं असतं? बाळासाहेब सगळ्यांना सोबत घेऊन पुढे जाणारे होते. आनंद दिघे जेव्हा तुरुंगात होते, तेव्हा बाळासाहेबांनी त्यांना बाहेर काढण्यासाठी वैयक्तिक शब्द टाकला. माझं काही काम करू नको, पण आनंद दिघेला काढण्यासाठी मदत कर. तुम्ही तर कार्यकर्त्यांना संपवायला निघाले. असा पक्ष मोठा होऊ शकत नाही. कार्यकर्ते मोठे झाले, तर पक्ष मोठा होतो. एखादा कार्यकर्ता मोठा व्हायला लागला, तर त्यांची पोटदुखी सुरू होते
रामदास कदमांना मी सांगितलं की वर्धापनदिनी षण्मुखानंदला येऊ नका. पण त्यांनी यायचा आग्रह केला. तुम्ही कारस्थान करून मनोहर जोशींना खाली उतरवायला लावलं. तीच गत, तोच डाव रामदास कदम यांच्याबद्दल तुम्ही आखला होता. मी सांगितलं येऊ नका, रामदास कदमांनी माझं ऐकलं. असा कुठला पक्षप्रमुख आपल्याच नेत्यांच्याबद्दल अशी कारस्थानं करू शकतो? आपल्या आमदारांची राजकीय कारकीर्द संपवण्यासाठी दुसऱ्या पक्षांची मदत घेऊन कटकारस्थान करू शकतो? या जगात असा नेता कुठी मी पाहिला नाही – शिंदे
योगेश कदमची राजकारणात सुरुवात झाली आहे. त्यानं काय तुमचं घोडं मारलंय? त्यानं तुमचं काय वाईट केलंय? तुम्ही त्याचं राजकारण संपवायला निघालात. दोन नगरपालिका राष्ट्रवादीच्या घशात घातल्यात याचा साक्षीदार मी आहे – एकनाथ शिंदे
हे सांगतायत ५० लोकांनी खोके घेतले. रामदास कदमांनी आख्खं आयुष्य संघटनेसाठी दिलं. जीवाची बाजी लावली. घरादारावर तुळशीपत्र ठेवलं. शेकडो केसेस अंगावर घेतल्या. तुम्ही त्यांना गद्दार म्हणताय? तुम्हाला बोलताना काहीतरी वाटलं पाहिजे. तुमच्यावर किती केसेस आहेत? या एकनाथ शिंदेवर १०९ केसेस आहेत. तुम्हाला बोलायचा अधिकार काय आहे? – शिंदे
एकनाथ शिंदे वफादार आहे. हा गद्दार नाही, खुद्दार आहे. माझ्या रक्तात बेईमानी नाही. छत्रपती शिवाजी महाराजांबरोबर दत्ताजी शिंदे, महादजी शिंदेंनी बलिदान दिलं. मागे नाही हटले. हा मावळा तुमच्यासारखा सत्तेसाठी कधी मिंधा झाला नाही, होणार नाही – एकनाथ शिंदे
मीडियावर बाईट देताना तुम्ही पाहिलंत की कोण कुणाला डोळा मारत होतं. अजित पवारांनीच डोळा मारला ना? हे सगळं काय चाललंय. जे आता गळ्यात गळा घालतायत, ते उद्या तुमचा कधी गळा दाबतील ते कळणार नाही. त्यांचा पूर्वेतिहास तपासून पाहा – एकनाथ शिंदे
तुमच्या डोक्यात काँग्रेस-राष्ट्रवादीनं मुख्यमंत्रीपदाचा बल्ब पेटवला आणि सगळंच बदललं. अशोक चव्हाण
तुम्ही म्हणाला होतात की मला मुख्यमंत्री व्हायचं नाही. मग म्हणालात पवारांनी सांगितलं की तुम्हालाच मुख्यमंत्री व्हावं लागेल. पण या प्रक्रियेत असणारे सगळे लोक माझ्या परिचित होते. तुम्हाला सत्तेचा मोह झाला. तुम्हाला खुर्चीची भुरळ पडली. तुम्ही ते वदवून घेतलंत. आनंद आहे. पण तुम्ही जेव्हा हिंदुत्वाबद्दल मूग गिळून गप्प बसलात, सावरकरांचा विषय आला, दाऊदचा विषय आला, हिंदुत्वाचे विषय जेव्हा आले, तेव्हा तुम्ही भूमिका बदलू लागलाग. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे म्हायलाही तुमची जीभ कचरू लागली, यापेक्षा दुर्दैवं अजून काय असू शकतं? – एकनाथ शिंदे
जो त्याच्या पक्षाचा अध्यक्ष होण्याची जबाबदारी घेऊ शकत नाही, तो देशाचा पंतप्रधान कसा होऊ शकतो? जो राज्य जिंकू शकत नाही, तो देश कसा जिंकू शकतो? तुम्ही अशा लोकांसाठी बाळासाहेबांचा मुलगा आणि नातू मतं मागतो? यापेक्षा या राज्याचं काय दुर्दैवं असू शकतं? – एकनाथ शिंदे
तुम्ही बाळासाहेबांच्या संपत्तीचे वारसदार आहात. पण विचारांचा वारसा तुम्ही सोडलात. आम्हाला तुमची संपत्ती नको. बाळासाहेबांचे विचार हीच आमची संपत्ती आहे. मला पत्रकारांनी विचारलं की शिवसेना मिळाली, धनुष्यबाण मिळालं., तुम्ही त्यांच्या मालमत्तेवर दावा सांगणार का? बिलकुल नाही – एकनाथ शिंदे
राहुल गांधी काश्मीरमध्ये तिरंगा फडकवला म्हणून ऐटीत सांगत आहेत. पण मोदींनी ३७० कलम हटवलं नसतं, तर तुम्ही ते धाडस केलं असतं का? – एकनाथ शिंदे
परदेशात या देशाची बदनामी करणारे राहुल गांधी यांना पंतप्रधान करायला निघालेल्या लोकांबरोबर आपण जाणार आहोत. बाळासाहेबांनी ज्यांना नेहमी दूर ठेवलं अशा लोकांना तुम्ही जवळ करणार का? बाळासाहेब म्हणायचे मला एक दिवस देशाचा पंतप्रधान करा, देशातलं ३७० कलम हटवतो. राम मंदिर बांधण्याचं स्वप्नं बाळासाहेबांचं होतं. मोदींच्या नेतृत्वाखाली अमित शाह
तुम्ही खोके, गद्दार म्हणून किती पाप झाकणार? बाळासाहेब ठाकरे तुमचे वडील होते हे किती वेळा सांगणार? हे जगाला मान्य आहे. पण बाळासाहेब तुमचे वडील असले, तरी ते सगळ्या शिवसैनिकांचं दैवत होते. तुम्ही त्यांना वडील म्हणून छोटं करू नका महाराष्ट्रातली जनता तुम्हाला माफ करणार नाही. – एकनाथ शिंदे.
राहुल गांधी वारंवार स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान करतात. पण त्यावर आपण काहीच बोलत नाहीत. तोंड दाबून बुक्क्यांचा मार खाण्याची वेळ येते. मणिशंकर अय्यरनं सावरकरांबाबत वक्तव्य केलं होतं, तेव्हा बाळासाहेबांनी त्याला चपलेनं झोडलं होतं. पण राहुल गांधींच्या विधानावर तुम्ही काहीच बोलत नाहीत. हे कसलं हिंदुत्व आहे? सावरकरांचा अपमान आम्ही सहन करू शकत नाही – एकनाथ शिंदे
सत्तेसाठी तुम्ही शिवसेना एनसीपी, काँग्रेसकडे गहाण ठेवली. गद्दारी आम्ही नाही केली. गद्दारी २०१९ला झाली. हिंदुत्वाचं राजकारण केलं ही चूक झाली असं विधानसभेत उद्धव ठाकरेंनी सांगितलं. म्हणजे तुम्ही बाळासाहेबांना चुकीचं ठरवलंत? बाळासाहेबांच्या भूमिकेला चुकीचं ठरवलंत. कशासाठी? सत्तेसाठी? यापेक्षा या महाराष्ट्राचं दुर्दैवं काय असू शकतं? – एकनाथ शिंदे
महाराष्ट्रात सर्कशीप्रमाणे त्यांचे जागोजागी शो होणार आहेत. पण तेच टोमणे असतील. खोके आणि गद्दार, याव्यतिरिक्त त्यांच्याकडे दुसरा शब्द आहे का? नाही – एकनाथ शिंदे
गेल्या आठवड्यात याच महिन्यात एक फुसका बार, आपटी बार येऊन गेला. उत्तर आरोप किंवा टीकेला द्यायचं असतं. पण तोच तो थयथयाट, आदळआपट याला काय उत्तर देणार? मुंबईतही सहा महिन्यांपासून अशीच आदळआपट चालू आहे. तोच खेळ चालू आहे, फक्त जागा बदलली होती – एकनाथ शिंदे
काही लोक ही सभा पाहात असतील. पण पूर्वी झालेली सभा, त्यावेळची गर्दी ही तुलना करायला आम्ही आलेलो नाही – एकनाथ शिंदे
एकनाथ शिंदेंच्या सभेतही लाव रे तो व्हिडीओ! उद्धव ठाकरेंनी शरद पवारांवर केलेल्या टीकेचा दाखवला व्हिडीओ
उद्धव ठाकरेंसोबत कुणीतरी नेता येऊन म्हणतो की असं पाडा की रामदास कदमचं कुटुंब पुन्हा उभं राहाता कामा नये. अरे बाबा, तुला मीच आणला, मीच उभा केला, तुला तिकीट मीच दिलं – रामदास कदम
ज्या रामदास कदमनं कोकणात खोकेच्या खोके वाटून तुमची उंची वाढवली. आणि आमच्यावर खोक्यांचा आरोप लावताना तुम्हाला लाज वाटली नाही का? – रामदास कदम
आमच्याकडे खूप गोष्टी आहेत. कुणाचे हॉटेल श्रीलंकेला, सिंगापूरला, लंडनला आहेत. अमेरिकेत कुणाच्या मालमत्ता आहेत हे एक दिवस महाराष्ट्राच्या जनतेसमोर आणल्याशिवाय राहणार नाही. खोक्याची भाषा तुमच्या तोंडात शोभते का? – रामदास कदम
उद्धवजी, अफजलखानासारखी तुमची इथे यायची हिंमत होणार नाही. हे इथे जमलेले हे लोक सांगतायत – रामदास कदम
२० आमदारांनी उद्धवजींना सांगितलं की राष्ट्रवादी सोडा, आम्ही बाकीच्या २० जणांना घेऊन येतो. तुम्ही त्यांनाही चालते व्हा सांगितलंत. कुठंतरी वर बसलेल्याची भीती ठेवा. खोटं बोल पण रेटून बोल. १९९० सालात माझ्यासमोरच्या उमेदवारासोबत दाऊद होता. त्याला मी घाबरलो नाही, तर तुमच्यासरखे भास्कर जाधवाला घेऊन येणाऱ्याला मी घाबरेल का? – रामदास कदम
गद्दार एपी, उद्धव ठाकरेंचा कलेक्टर. तो १५ ऑगस्ट, २६ जानेवारीला यायचा. फक्त योगेश कदमला कसं संपवायचं. उदय सामंतही तेव्हा त्या गटात होते, कटात नव्हतात. तो बदमाश सुभाष देसाई सगळ्यात पुढं होता हलवायला. उद्धवजी, बाळासाहेब ठाकरे रामदास कदमसारख्या वाघाला सांभाळायचे, तुम्ही सुभाष देसाईसारख्या शेळ्या-मेंढ्यांना सांभाळता हा तुमच्यातला फरक आहे – रामदास कदम
तुम्ही सगळ्यांना त्यांच्या त्यांच्या जिल्ह्याचं पालकमंत्रीपद दिलं. पण रामदास कदमला रत्नागिरीत पालकमंत्रीपद दिलं नाही – रामदास कदम
दापोलीत योगेश कदमला पाडण्याचा प्रयत्न उद्धव ठाकरेंनी केला. उद्धव ठाकरे,
उद्धवजी, तुम्ही बाळासाहेबांचे सुपुत्र आहात ना? मग तुमच्या वडिलांच्या विचारांशी बेईमानी तुम्ही का केलीत? त्यांच्या विचारांशी गद्दारी का केली? २००९मध्ये तुम्ही मला गुहागरमधून तिकीट दिलं. पण तिथून तुमच्याच एका माणसाला तिथे नेमून तुम्ही मला पाडलंत. कारण तुम्हाला मुख्यमंत्री व्हायचं होतं. या भास्कर जाधवची काय औकात होती मला पाडायची. असे १०० जाधव खिशात घेऊन फिरतो मी – रामदास कदम
बाळासाहेब असंही म्हणाले होते की ज्या दिवशी माझ्यावर काँग्रेसबरोबर जाण्याची वेळ येईल, तेव्हा शिवसेना नावाचं दुकान मी बंद करून टाकेन. बोला उद्धवजी. तुमची सभा केवढी झाली. ही सभा केवढी आहे हे तुम्ही गपचूप लपून बघत असाल. त्या भास्कर जाधवचे कुणी चमचे असतील इथे तर त्यांना म्हणावं जाऊन बघा, सगळी ट्रॅफिक बंद आहे. इथल्यापेक्षाही चार पटीनं लोक बाहेर थांबलेत. शिवाजी पार्कपण कमी पडलं असतं – रामदास कदम
माशाच्या पिल्लाला पोहायला शिकवायला लागत नाही, हे योगेश कदमनं दाखवून दिलं आहे – रामदास कदम
एकनाथ शिंदे झोपतात कधी, उठतात कधी याचं संशोधन सगळीकडे चालू आहे. दिवसरात्र काम करणारे हे महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री आहेत – रामदास कदम
महाराष्ट्रात चालू असलेली पवारशाही आणि उद्धवशाही समूळ नष्ट करा. एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखाली शिवशाही महाराष्ट्रात आणा – गजानन कीर्तीकर
४० आमदार आणि १२ खासदारांनी उठाव केला. सत्तेच्या खुर्चीकडे आकर्षित न होता ते तिकडे गेले. असा एक नेता मिळाल्यानंतर आम्हाला एक संधी मिळाली. स्वत:चं पाप झाकण्यासाठी ते खोके म्हणून वल्गना करतायत. बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवून शिवसेना नष्ट होणार होती याच्या आम्हाला वेदना होत होत्या – गजानन कीर्तीकर
योगेश कदमांना राजकीय दृष्ट्या कसं संपवायचं हे षडयंत्र ज्या बैठकीत रचलं, त्या बैठकीला मीदेखील होतो. दापोलीच्या निवडणुकीत योगेश कदमांना किती तिकिटं द्यायची, यावर फार मोठी चर्चा झाली. त्यांच्यापेक्षा राष्ट्रवादीला जास्त तिकिटं द्यायची असा अघोषित नियम झाला होता. नंतर योगेश कदमांना काहीच द्यायचं नाही, त्यांच्या मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस रुजवायची हा निर्णय शिवसेनेच्या नेत्यांनी घेतला – उदय सामंत
खेड येथील विराट सभेत राज्यातील प्रश्न सोडवण्यासाठी माननीय एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सरकारने केलेल्या कामाचा आढावा मांडला. कोकणाला या सरकारने भरघोस मदत केलीय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कोकणाला बरंच काही देण्यासाठी आले आहेत. #ShivSena https://t.co/qe6Cjy2Lc4
— Uday Samant (@samant_uday) March 19, 2023
(फोटो-लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
CM Eknath Shinde Speech in Khed: उद्धव ठाकरेंची सभा झालेल्या मैदानावरच एकनाथ शिंदेंची जाहीर सभा!