मणक्याच्या शस्त्रक्रियेमुळे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे काही काळापासून घरातच होते. करोना परिस्थिती आणि शस्त्रक्रियेनंतर घ्यायची काळजी यामुळे मुख्यमंत्री राज्याच्या अधिवेशनालाही उपस्थित राहू शकले नाहीत. त्यावरून विरोधकांनी मुख्यमंत्र्यांवर टीकेचा भडिमार केला होता. अजूनही त्यांच्यावर टीका करणं सुरूच आहे. मात्र आज तब्बल दोन महिन्यांनी मुख्यमंत्र्यांनी प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमाला हजेरी लावली. त्यावरूनच आता मुख्यमंत्री Back in Action आहेत असं वक्तव्य आदित्य ठाकरे यांनी केलं आहे. राज्याचे पर्यावरण मंत्री आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे चिरंजीव आदित्य ठाकरे यांनी आज माध्यमांशी बोलताना हे वक्तव्य केलं आहे. आदित्य ठाकरे म्हणाले, मुख्यमंत्र्यांनी स्वतःच सांगितलं होतं की त्यांची तब्येत ठीक आहे. मात्र या कोविडमध्ये आम्ही सगळेच जरा जास्त काळजी घेत होतो. आता ते बाहेर पडले आहेत. Back in Action आहेत.मधे ऑनलाइन होते, आता सगळीकडे दिसतील. मुख्यमंत्री लवकरच कमबॅक करतील; आदित्य ठाकरेंचं विरोधकांना उत्तर यापूर्वीही आदित्य ठाकरे यांनी याप्रकरणी भाष्य केलं होतं. मुख्यमंत्री लवकरच कमबॅक करतील असंही ते म्हणाले होते. मुख्यमंत्र्यांच्या अनुपस्थितीमुळे विरोधकांकडून होणाऱ्या टीकेबद्दल आदित्य ठाकरे म्हणाले होते, “मुख्यमंत्री कधीही मैदानात उतरण्यासाठी तयार आहेत. पण आम्हीच ओमायक्रॉनमुळे काळजी घेत आहोत. विरोधी पक्ष जे काही गलिच्छ राजकारण करत आहेत त्यावर फार काही बोलायचं नाही. ते कितीही खालच्या स्तराला जाऊ शकतात. आम्ही काही त्यांच्या तोंडी लागणार नाही”.