भारताचे संरक्षण दल प्रमुख जनरल बिपिन रावत यांचं आज हेलिकॉप्टर अपघातात निधन झालं. त्यांच्यासोबत त्यांच्या पत्नी आणि विमानात उपस्थित असलेल्या इतर ११ जणांनीही आपले प्राण गमावले आहेत. त्याबद्दल आता देशभरातून शोक व्यक्त करण्यात येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्यासह अनेक प्रमुख नेत्यांनी त्यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करत त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही जनरल रावत यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे.

“भारताचे संरक्षण दल प्रमुख जनरल बिपिन रावत आज आपल्यात नाहीत हे मनाला पटतच नाही. या अतिशय दुर्दैवी दुर्घटनेची माहिती कळल्यापासून मी खूप अस्वस्थ आहे. ते यातून वाचतील असे सारखे वाटत होते. पण शेवटी ती दुर्दैवी बातमी आलीच. अनेक आघाड्यांवर शौर्याने आणि धडाडीने नेतृत्व करणाऱ्या संरक्षण दलाच्या प्रमुखांचा त्यांच्या सहकाऱ्यांसमवेत असा मृत्यू होणं नियतीलाही मान्य असणार नाही. मी जनरल रावत आणि त्यांची पत्नी तसेच अन्य लष्करी अधिकाऱ्यांच्या मृत्यूमुळं खूप व्यथित झालो आहे”, अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तीव्र शोक व्यक्त केला आहे.
दुर्घटनेतील मृतांना श्रद्धांजली अर्पण करून, त्यांच्या कुटुंबियांप्रतिही मुख्यमंत्र्यांनी सहवेदना प्रकट केली आहे. ही दुर्घटना अत्यंत विषण्ण करणारी, दुर्दैवी असल्याचे मुख्यमंत्री म्हणतात.

हेही वाचा – जनरल बिपिन रावत यांच्या निधनावर पंतप्रधानांनी व्यक्त केला शोक; म्हणाले, “त्यांच्या निधनामुळे मी प्रचंड दु:खी झालोय”

आपल्या शोक संदेशात मुख्यमंत्री म्हणतात, “भारताचे संरक्षण दल हे सुसज्ज आणि बलशाली आहे. या तीनही दलांचे असे संयुक्त प्रमुखपद भूषवण्याचा पहिला गौरवही दिवंगत जनरल रावत यांना मिळाला. त्यांची कारकिर्दही त्यांच्या व्यक्तिमत्वाला आणि पदाला साजेशीच अशी होती. संरक्षण दलाला तडफदार आणि सर्व आघाड्यांवर ठसा उमटविलेल्या अनुभवी असे नेतृत्व मिळाल्याने आपल्या तीनही दलांचे मनोबल उंचावले होते,  त्याचे प्रत्यंतरही अलिकडच्या तीनही दलांच्या कामगिरीतून दिसत होते”.