करोना संसर्ग रोखण्यासाठी राज्यात करोना लसीकरण करण्यात येत आहे. दरम्यान, काल राज्यात काल २१ सप्टेंबर रोजी सुमारे ३६ लाख कोरोना प्रतिबंधक लसीचे डोस शिल्लक होते. त्यामुळे ज्या जिल्ह्यांत कमी डोसेस दिले असतील त्यांनी लसीकरणाचा वेग मोठ्या प्रमाणावर वाढवावा, असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज मंत्रिमंडळ बैठकीत दिले आहेत.

लसीकरणामुळे संसर्ग होऊन देखील रोगाची तीव्रता कमी असते शिवाय मृत्यूचे प्रमाण नगण्य आहे हे लक्षात घेऊन लसीकरण मोठ्या प्रमाणावर पूर्ण करावे असे सांगून मुख्यमंत्र्यांनी रुग्ण संख्या कमी होत असली तरी आरोग्याचे नियम पाळण्यात बेफिकिरी, नको असे स्पष्ट केले.

३ हजार १३१ नवीन करोनाबाधित आढळले

राज्यात करोना संसर्गाची दुसरी लाट ओसरत असल्याचे सांगितले जात असले, तरी देखील अद्यापही दररोज नवीन करोनाबाधित आढळून येत आहेत. दररोज आढळणाऱ्या करोनाबाधितांची संख्या ही कधी करोनामुक्त झालेल्यांपेक्षा कमी तर कधी जास्त आढळून येत आहे. तर, करोनाबाधित रूग्णांच्या मृत्यू संख्येत मात्र रोज भर पडतच आहे. राज्यात काल दिवसभरात ४ हजार २१ रूग्ण करोनामुक्त झाले असून, ३ हजार १३१ नवीन करोनाबाधित आढळून आले. याचबरोबर, ७० करोनाबाधित रूग्णांचा मृत्यू झाल्याची देखील नोंद झाली आहे.

राज्यात आजपर्यंत एकूण ६३,४४,७४४ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९७.२ टक्के एवढे झाले आहे.