मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याहस्ते मुंबईतील सह्याद्री अतिथीगृहात वन्यजीव सप्ताह २०२१ चा शुभारंभ आज करण्यात आला. यावेळी मुख्यमंत्र्यांनी पर्यावरण रक्षणाच्या दृष्टीने आपली भूमिका स्पष्ट केली. मात्र, हे सांगतानाच मुख्यमंत्र्यांनी पर्यावरण रक्षणाच्या दृष्टीने जशी जनजागृती केली जाते, तशीच राजकीय नेत्यांचीही जनजागृती व्हायला हवी, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे आणि सरकारमधील ज्येष्ठ अधिकाऱ्यांसोबतच वनविभागाचेही अनेक अधिकारी आणि कर्मचारी या कार्यक्रमाला उपस्थित होते. या कार्यक्रमावेळी मुख्यमंत्र्यांनी आपली भूमिका मांडली आहे. वनखात्याचा कारभार सध्या मुख्यमंत्र्यांकडेच असल्यामुळे वनमंत्री या नात्याने मुख्यमंत्री या कार्यक्रमाला उपस्थित होते. यावेळी मुख्यमंत्र्यांच्याच हस्ते पेंच व्याघ्र प्रकल्पाच्या लोगोचं अनावरण करण्यात आलं.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हाताने कायदे करायचे आणि…

यावेळी मुख्यमंत्र्यांनी सर्वच राजकीय नेत्यांचे कान टोचले. “पर्यावरण, वनसंरक्षण याबद्दल जनजागृती झाली पाहिजे. पण त्यासोबतच राजकीय नेत्यांचीही जागृती झाली पाहिजे. अनेकदा आपण आपल्या सोयीप्रमाणे कायदे बनवतो. नियम पायदळी तुडवत असतो. हाताने कायदे करायचे आणि पायदळी तुडवायचे. आपण आपल्या सोयीप्रमाणे कायद्याचे अर्थ लावत असतो, अर्थ बदलत असतो. त्यात काही वेळा मोकळीक देत असतो. विकासाचं वेडं स्वप्न पूर्ण करण्यासाठी नेमका कसला विनाश करतोय, ते न बघता आपण पुढे जात असतो”, असं उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले.

CRZ विषयीही मांडली भूमिका

दरम्यान, यावेळी बोलताना मुख्यमंत्र्यांनी गुरुवारी मंजूर झालेल्या सीआरझेडच्या सागरी किनारा व्यवस्थापन आराखड्याला मंजुरी मिळाल्यासंदर्भात देखील भूमिका मांडली. “नवीन वस्त्या उभारताना आपण मूलभूत सुविधा कशा देणार? विकासाला माझा अजिबात विरोध नाही. सीआरझेडच्या कायद्यात शिथिलता आणल्यानंतर बिल्डरांनी मोकळा श्वास सोडला. पण या इमारती बांधत असताना त्यासाठीचं पाणी, मलनि:स्सारण कसं करणार?”, असा सवाल उद्धव ठाकरेंनी उपस्थित केला.

आपण स्वत:ला पृथ्वीचे मालक समजायला लागलोय…

“जिथे जंगल जास्त असतं, तिथे जास्त पाऊस पडतो असं मानलं जातं. आम्ही शाळेत होतो, तेव्हा सर्वात जास्त पाऊस चेरापुंजीला पडायचा. आता त्या प्रश्नाचं उत्तर १०० टक्के चुकीचं ठरेल. कारण प्रत्येक मोसमात आजपर्यंतचा सर्वात जास्त पाऊस पडतो. आता चेरापुंजीचं नावच नाही येत. मुंबईत, मराठवाड्यात, कोकणात सगळ्यात जास्त पाऊस पडला. हे का घडतंय? आपण जी वृक्षतोड करत आलो आहोत, ती कुठेतरी थांबणार आहे की नाही. आपण आता स्वत:ला पृथ्वीचे मालक समजायला लागलो आहोत. निसर्गाचा नियम आता कुणीच पाळत नाहीये”, असं ते म्हणाले.

निसर्ग आपल्याला इशारे देत असतो..

दरम्यान, निसर्ग आपल्याला सातत्याने इशारे देत असतो, असं मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं. “निसर्ग आपल्याला सांभाळायचा प्रयत्न करतो. पण जेव्हा अतिशयोक्ती होते, तेव्हा मात्र निसर्ग कठोर रूप घेतो. निसर्गाचा निर्णय भयानक असतो. तिथे दया-माया दाखवली जात नाही. मग पूर येतो, अतिवृष्टी होते, करोनासारखं संकट येतं. निसर्गनियम आपण बघतच नाही. निसर्ग आपल्याला संकेत, इशारे देत असतो. पण जेव्हा आपण त्यावर अतिक्रमण करतो, तेव्हा निसर्ग त्याच्या पद्धतीने दूर करत असतो”, असं उद्धव ठाकरेंनी यावेळी सांगितलं.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Cm uddhav thackeray points out political leaders on environment issue pmw
First published on: 01-10-2021 at 14:09 IST