पंढरपूर : राज्यात सर्वदूर थंडीची सुरुवात झाली. थंडीपासून बचाव करण्यासाठी स्वेटर, कानटोपी, शाल खरेदी केली जात आहेत. अशातच लाखो वैष्णवांचे श्रद्धास्थान असलेला सावळ्या विठुरायाचा पहाटेचा पोशाख देखील बदलला आहे. विठुरायाला सुतीची कानपट्टी तर रखुमाईला उबदार शाल पांघरली जाते. कार्तिक वद्य पंचमी ते माघ शुद्ध पंचमी या काळात पहाटे काकड आरती झाल्यावर सकाळी ८.३० पर्यंत हा पोशाख असतो, अशी माहिती श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे सह अध्यक्ष ह.भ.प. गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी दिली.

देवाला प्रत्येक ऋतू प्रमाणे पोशाख आणि आहार दिला जातो. हिवाळ्यात विठुराया आणि रखुमाईला सकाळी उबदार पोशाख असतो. पहाटे काकड आरती झाल्यानंतर विठुरायाला कानपट्टी बांधली जाते. डोक्यावरून दोन्ही कान झाकले जातात. अंगावर शाल अशा पोशाखात राजस सुकुमार असे विठुरायाचे रूप दिसून यते. तर रखुमाईला दोन्ही खांद्यावरून उबदार शाल पांघरली जाते. वारकरी संप्रदायाची शेकडो वर्षांची परंपरेनुसार देवाचे पोशाख आणि आहार याची परंपरा आजही जोपासली जात आहे. आपण इंग्रजी महिन्यानुसार हिवाळा, उन्हाळा, पावसाळा हे ऋतू पाळतो. मात्र, मराठी महिन्यानुसार देवाचे ऋतुमान आणि त्यानुसार आहार आणि पोशाखाची परंपरा आहे.

विठुरायाला सुतीची कानपट्टी तर रखुमाईला उबदार शाल पांघरली जाते. कार्तिक वद्य पंचमी ते माघ शुद्ध पंचमी या काळात पहाटे काकड आरती झाल्यावर सकाळी ८.३० पर्यंत हा पोशाख असतो, अशी माहिती श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे सह अध्यक्ष ह.भ.प. गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी दिली. त्याप्रमाणे कार्तिक वद्य पंचमीपासून पहाटे देवाला थंडीपासून बचाव करणारे पोशाख परिधान केले जातात.

माघ शुद्ध पंचमीपर्यंत हिवाळा ऋतू मानला जातो. या काळात थंडी असते. त्यामुळे देवाला पहाटे उबदार पोशाख परिधान केला जातो. माघ पंचमीपासून पुढे उन्हाळा सुरू होतो. त्यावेळी देवाला पांढरा पोशाख तर पुढे चंदन उटी लावून उन्हाची दाहकता कमी केली जाते. पोषाखाप्रमाणे देवाचा आहार देखील ज्या त्या ऋतू प्रमाणे दिला जातो. असे असले तरी पहाटेच्या पोशाखात देवाचे रूप अधिकच खुलून दिसतंय.