भुईंज येथील किसन वीर सातारा सहकारी साखर कारखान्याने व त्यांनीच भाडेतत्त्वावर घेतलेल्या प्रतापगड कारखान्याने ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे शेवटच्या दोन महिन्याचे सुमारे ७५ कोटी रु पयांचे बिल अदा केले नसल्याची तक्रार साखर आयुक्तांकडे दाखल झाली आहे.
यावर्षी सर्वच साखर कारखाने ऊस दरवाढीच्या आंदोलनामुळे उशिरा सुरू झाले. त्यामुळे सर्वत्र उसाच्या तोडी उशिराने झाल्या. त्यामुळे जास्तीजास्त ऊस गाळपाला आणण्याचा आटापिटा करण्याच्या नादात अनेक कारखाने एप्रिलच्या अखेर व मे च्या मध्यापर्यंत सुरू होते.
ऊस तोडीनंतर जिल्हयातील इतर सर्वच साखर कारखान्यांनी आपले बिल शेतकऱ्यांना अदा केले आहे. यामध्ये सहयाद्री साखर कारखान्याने २२०० रु. प्रती टन, कृष्णा कारखान्याने २२२१ रु. प्रती टन, अिजक्य कारखान्याने २२१० रु. प्रती टन, मरळी कारखान्याने २२२० रु. प्रती टन, श्रीराम फ़लटण कारखान्याने २१०१ रु. प्रती टन, जरंडेश्वर कारखान्याने २२५० रु. प्रती टन, जयवंत कारखान्याने २२१५ रु. प्रती टन, रयत कारखान्याने २२५० रु. प्रती टन प्रमाणे अंतिम बिल अदा केले आहे. जिल्हयातील इतर कारखान्यांच्या तुलनेत किसन वीर व प्रतापगडचा दर कमी असतानाही किसन वीर साखर कारखान्याने शेवटच्या दोन महिन्यातील बिल अदा केलेले नाही. याबाबत पुणे येथील प्रादेशिक सह. संचालक (साखर) सचिन रावळ व उपसंचालक अर्थ विभाग डॉ. संजय भोसले यांनी याला दुजोरा दिला. किसन वीर कारखान्याला याकामी नोटीस बजावण्यात आली असून त्यांना ताबडतोब शेतकऱ्यांचे पैसे अदा करण्याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत, असे त्यांनी सांगितले. तसेच यासंदर्भातील सुनावणी साखर आयुक्तांपुढे सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.
किसन वीर साखर कारखान्याने शेवटच्या दोन महिन्यात गाळप केलेल्या २ लाख ५६ हजार ३३५ मेट्रिक टन उसाचे तर प्रतापगड कारखान्याने ९० हजार मेट्रिक टनाचे गाळप केले असून त्याचे बिल प्रती टन २१२२ रु पयांप्रमाणे एकुण ७५ कोटी रु पये ऊस उत्पादक शेतकऱ्यांना दिलेले नाहीत. त्यापैकी २२ कोटी रुपये नुकतेच विकास सेवा सोसायटयांकडे वर्ग केले असून उर्वरित ५३ कोटी रुपये शेतकऱ्यांना देणे बाकी आहे. कारखान्याने ऊसाचे गाळप केल्यापासून पंधरा दिवसांमध्ये एफ़.आर.पी. नुसार शेतकऱ्यांचे पैसे देणे कायद्यानुसार बंधनकारक आहे. अन्यथा संचालक मंडळावर गुन्हा दाखल करण्याची तरतूद असल्याचे साखर आयुक्त कार्यालयातून सांगण्यात आले.
दरम्यान, कारखान्याच्या या थकबाबीबाबत अध्यक्ष मदन भोसले यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी  हे देणे द्यायचे राहिले असल्याचे मान्य करत ते लवकरच दिले जाईल, असे सांगितले.