संस्थेच्या इतिहासात प्रथमच रुग्णसेवा ठप्प सेवाग्रामच्या महात्मा गांधी आयुर्विज्ञान संस्थेत बुधवारी विनयभंगाच्या तक्रारीवरून अभूतपूर्व गोंधळ उडाला. यामुळे संस्थेच्या इतिहासात प्रथमच रुग्णसेवा ठप्प झाली. या वैद्यकीय महाविद्यालयातील डॉ. चयन सरकार यांच्याविरोधात एका प्रशिक्षणार्थी महिला डॉक्टरने विनयभंगाचा आरोप करीत सेवाग्राम पोलिसांकडे तक्रार दाखल केली होती. त्याची दखल घेत पोलीस कारवाईला लागल्यानंतर डॉक्टरांनी अटकपूर्व जामीन मिळविल्याने त्यांची अटक तूर्तास टळली. मात्र, तक्रारकर्त्यां प्रशिक्षणार्थी डॉक्टरविरोधात यापूर्वी संस्थाचालकांकडे केलेल्या तक्रारीचे काय, असा सवाल करीत पदव्युत्तर शाखेचे विद्यार्थी, वरिष्ठ प्रशिक्षणार्थी व वैद्यकीय शाखेतील विद्यार्थ्यांनी मिळून आरोपी डॉ. सरकार यांच्या समर्थनार्थ जोरदार निदर्शने केली. डॉ. सरकार यांनी तक्रारकर्त्यां मुलीला शिस्तभंग केल्याबद्दल हटकले होते. मात्र, मुलीने डॉ. सरकार आणि दोन महिला डॉक्टरांविरोधात पोलिसांत तक्रार केली. याबाबत संस्थेचे सचिव डॉ.गर्ग यांच्याशी वारंवार संपर्क करूनही प्रतिसाद मिळाला नाही. मात्र, तूर्त तरी वातावरण निवळल्याचे समजते.