काही दिवसांपूर्वीच भाजपा नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी महाराष्ट्रातील महाविकासआघाडी सरकारचं आयुष्य जास्त नसल्याचा इशारा दिला होता. तसेच लवकरात लवकर महाराष्ट्रात भाजपाचं सरकार येईल, अशी नवी राजकीय भविष्यवाणीही केली होती. त्यांच्या या विधानानंतर सत्ताधाऱ्यांसह भाजपाच्याही अनेक नेत्यांनी प्रतिक्रिया दिल्या होत्या. काहींनी त्यांचं विधान खोडून काढण्याचा प्रयत्न केला, तर काहींनी संदिग्ध इशाऱ्यांमधून आपली प्रतिक्रिया व्यक्त केली. त्याच पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते तसंच राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. नांदेड जिल्ह्याचे पालक मंत्री आणि राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण आज पत्रकार परिषदेमध्ये बोलताना त्यांनी राज्यातल्या महाविकास आघाडी सरकारच्या कामाचं कौतुक केलं आहे. त्याचबरोबर मराठा आरक्षणावरुन टीका करणाऱ्या चंद्रकांत पाटलांनाही टोला हाणला आहे. नारायण राणेंच्या सत्ताबदलाच्या वक्तव्यावरुन चव्हाण म्हणाले, ते ब्रह्मज्ञानी असू शकतात आणि त्यावर मला जास्त बोलायचं नाही. काय म्हणाले होते नारायण राणे? महाराष्ट्र सरकार भेदभाव करत असल्याच्या आरोपावर बोलताना नारायण राणे म्हणाले, “महाराष्ट्रात भाजपाचं सरकार नाही त्यामुळे तिथं तसं होतंय. लवकरात लवकर महाराष्ट्रात भाजपाचं सरकार येईल आणि तुम्हाला अपेक्षित बदल दिसेल. माझ्या आतमध्ये जी गोष्ट आहे ती आत्ताच बाहेर सांगायची नाहीये. एखादं सरकार पाडायचं असेल आणि नवं सरकार स्थापन करायचं असेल तर काही गोष्टी गुपित ठेवाव्या लागतात. अशा ठिकाणी काही बोललो तर आणखी एखादा महिना पुढे ढकलेल".