मुंबईतील ट्रायडंट हॉटेलमध्ये सुरू असलेली महाविकास आघाडीची बैठक संपली आहे. राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या बैठकीत अनेक मुद्यांवर चर्चा झाल्याचं समजत आहे. तसेच महाविकास आघाडीकडे पुरेसं संख्याबळ असल्यानं सर्व उमेदवार निवडून येतील, असा विश्वास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केला आहे. या बैठकीनंतर इतर अनेक राजकीय नेत्यांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. यावेळी महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी देखील आपली प्रतिक्रिया दिली आहे. ज्यांच्याजवळ आकडे जास्त असतील ते निवडून येतील. महाविकास आघाडीचे चारही उमेदवार निवडून येणार, हे सांगण्यासाठी कुठल्या ज्योतिषाकडे जाण्याची गरज नाही, असंही त्यांनी म्हटलं आहे. यावेळी त्यांनी भारतीय जनता पार्टीवर टीका केली आहे. त्यांनी पुढे बोलताना सांगितलं की, "ज्या लोकांना पैशांचा आणि केंद्रीय सत्तेचा घमंड आला आहे. त्याचं नामोहरम होणार हे नक्की झालं आहे. आमच्याकडे पुरेसं संख्याबळ असून ते कोणत्याही दबावाखाली विभाजित केलं जाऊ शकत नाही, असंही ते म्हणाले. खरंतर, महाराष्ट्रात तब्बल दोन दशकांनंतर राज्यसभा निवडणुका पार पडत आहेत. त्यामुळे नवीन आमदारांना संबंधित निवडणूक कशी असते, याच्या तांत्रिक बाबी समजावून सांगण्यासाठी कार्यशाळा घेतली जाईल किंवा मार्गदर्शन केलं जाईल, अशी शक्यता वर्तवण्यात येत होती. मात्र अशाप्रकारची कोणतीही कार्यशाळा बैठकीत झाली नाही. या बैठकीत १२ अपक्ष आमदारांसह काँग्रेसचे ३२, शिवसेनेचे ४५, राष्ट्रवादीचे ४२ आमदार उपस्थित होते. त्यामुळे महाविकास आघाडीचं पारडं जड झालं आहे.