सांगली : महाराष्ट्रात खंडणीखोरांना राजाश्रय मिळत असल्याने राज्यात सहा जिल्हे वगळता अन्यत्र उद्योजक गुंतवणूक करण्यास पुढे येत नाहीत. याचा परिणाम बेरोजगारीवर होत आहे. राज्य सरकारने मुख्यमंत्री कार्यालयात खंडणीखोरा विरूध्द कक्ष स्थापन करून याला पायबंद घातला पाहिजे असे मत राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी बुधवारी व्यक्त केले.
आज चव्हाण यांनी शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांच्या निवासस्थानी माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले, मुंबई, पुणे, नागपूर, ठाणे, नाशिक आणि रायगड वगळता अन्य जिल्ह्यात नवे उद्योग उभा राहात नाहीत. याला कारण खंडणीखोरी आहे. खंडणीखोरीला राजाश्रय मिळत असल्याने ही प्रवृत्ती फोफावली आहे. विकसित सहा जिल्ह्यातच राज्याचे ७५ टक्के उत्पन्न मिळते, मात्र, अन्य जिल्ह्यांचा विचार व्हायला हवा, यासाठी खंडणीखोरीला आळा बसला पाहिजे. केवळ रस्ते बांधकाम केले तर प्रगती झाली असे म्हणता येणार नाही. समृध्दी येणे महत्वाचे आहे. दरडोई उत्पन्नामध्ये राज्य आता अकराव्या नंबरवर पोहचले आहे. राज्य सरकार अडचणीत असून सत्तेवर असलेल्या तीनही पक्षात अंतर्गत बेबनाव आहे. भ्रष्टाचार मोठ्या प्रमाणात वाढला असून याचा फटका जनतेला बसत आहे.
काश्मिरमध्ये झालेला अतिरेकी हा निंदनीयच आहे. याविरूध्द कारवाई करण्यास सर्वच विरोधी पक्षांनी सरकारला पाठिंबा दिला आहे,अतिरेकी प्रवृत्तीचा बिमोड करायलाच हवा, यासाठी आम्ही सर्व विरोधी पक्ष सरकारच्या भूमिकेचे समर्थन करत आहोत.
अमेरिकेत डोनाल्ड ट्रम्प यांनी एक तर्फी व्यापार युध्द सुरू केले आहे. याचे गंभीर परिणाम सर्वच देशावर होणार आहेत. अमेरिकेच्या दबावाखाली केंद्र शासनाने करार करत असताना केवळ वाणिज्य मंत्रालयाच्यामार्फत करार न करता कृषी व उद्योग विभागाचाही विचार करायला हवा. जागतिक व्यापार संघटनेचा भारत संस्थापक सदस्य आहे. मात्र ट्रम्प यांच्या भूमिकेमुळे या संघटनेचे अस्तित्वच धोक्यात आले असून अमेरिकेशी व्यापार करार करत असताना सरकारने विरोधकांनाही विश्वासात घेण्याची गरज आहे. जे करार होणार आहेत, त्याचा कृषी व लघू उद्योगावर विपरित परिणाम होण्याची भीती आहे.
जात निहाय जनगणना करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला असेल तर त्याचे स्वागतच करायला हवे. याची सुरूवात 2011 मध्ये मनमोहन सिंग सरकारने केली होती. त्याची आकडेवारीही उपलब्ध झाली होती. मात्र तांत्रिक कारणामुळे ती जाहीर करता आली नाही. यामुळे जातनिहाय जनगणना करण्यास काँग्रेसचा विरोध आहे असा आरोप चुकीचा असल्याचेही त्यांनी सांगितले.
सांगली डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील हे जर शिवसेना शिंदे पक्षात येणार असतील तर त्यांच्यासाठी आमची दारे कायम खुली आहेत असे प्रतिपादन खा. श्रीकांत शिंदे यांनी मंगळवारी सायंकाळी मिरजेत बोलताना केले.
खा. शिंदे म्हणाले, पैलवान पाटील हे चांगले कार्यकर्ते आहेत. यामुळे त्यांनी जर आमच्या पक्षात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला तर त्याचे स्वागतच आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सामान्य कार्यकर्त्याला वेळ देणारे नेते आहेत. कुणीही त्यांच्याशी संपर्क साधू शकतो. यामुळे अनेकजण शिवसेनेत येउ इच्छित आहेत. उपमुख्यमंत्री शिंदे यांनी राज्यात अनेक योजना राबवल्या. त्यांच्या कार्यपध्दतीवर विश्वास ठेवून काही जण पक्ष प्रवेश करत असतील तर त्यांचे स्वागतच आहे. चंद्रहार पाटील हे ताकदीचे पैलवान असून त्यांना लागणारी अतिरियत ताकद शिवसेना निश्चितपणे पुरवेल असेही त्यांनी सांगितले.