राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असते तर चित्र वेगळं असतं असं विधान राज्याच्या महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांनी जाहीर भाषणामध्ये केल्यानंतर राज्यातील राजकीय वर्तुळामध्ये चर्चांना उधाण आलं. शिवसेनेनंही या प्रतिक्रियेवर उत्तर दिलं. या वक्तव्याच्या निमित्ताने महाविकास आघाडीतील शिवसेना आणि राष्ट्रवादी हे दोन्ही मोठे पक्ष पुन्हा एकदा एकमेकांसमोर उभे ठाकल्याचं चित्र दिसलं. दरम्यान काँग्रेसचे ज्येष्ठ नेते यांनी यावर भाष्य केलं आहे. नेमकं घडलं काय? शरद पवार हे रविवारी अमरावती दौऱ्यावर होते. अमरावती येथील डॉ.पंजाबराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालयात शरद पवार यांच्या उपस्थितीत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे अनावर व सभागृहाचे लोकार्पण सोहळाच्या कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला शरद पवारांबरोबरच महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूरांसहीत इतर नेतेही उपस्थित होते, या कार्यक्रमात मंत्री यशोमती ठाकूर यांनी बोलताना मुख्यमंत्री पदाबाबद मोठं वक्तव्य केलं. यशोमती ठाकूर काय म्हणाल्या? “शरद पवारांसाठी काय आणि किती बोलावं. छोट्या तोंडी मोठा घास घेतेय पण तुम्ही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असता तर महाराष्ट्राचं चित्र अजून वेगळं असतं,” असं यशोमती ठाकूर म्हणाल्यानंतर काही उपस्थितांनी टाळ्या वाजवल्या. त्यावर पुन्हा बोलताना, “टाळ्या वाजवायला काहीच हरकत नाही. पवारांसाठी जोरात टाळ्या वाजवा,” असं यशोमती ठाकूर म्हणाल्या. सुशीलकुमाऱ शिंदे काय म्हणाले ? सुशीलकुमार शिंदे यांना प्रसारमाध्यमांनी यशोमती ठाकूर यांच्या वक्तव्यासंबंधी विचारलं असता त्यांनी त्यांनाच विचारा असं सांगत उत्तर देणं टाळलं. दरम्यान युपीएच्या अध्यक्षपदासाठी शरद पवारांचे नाव चर्चेत असलं, काही लोकांची मागणी असली तरी अध्यक्षपदासाठी जागाच खाली नाही आहे असंही त्यांनी स्पष्ट सांगितलं. राज्यातील नेत्यांकडून आरोप-प्रत्यारोप सुरु असून पातळी खालावली असल्याच्या प्रश्नावर बोलताना त्यांनी म्हटलं की, "काय बोलावं हेच कळत नाही. आम्ही जो काळ अनुभवलेला आहे त्यावेळी काही परंपरा, इतिहास, संकल्पना आणि काही संकेत पाळून बोलत होतो. आज ते कमी झालं आहे. याच्यातूनही ते सुधारतील अशी अशा आहे". सुजात आंबेडकर यांनी दंगल पेटवणारे उच्चवर्णीय ब्राह्मण असतात असं विधान करण्यासंबंधी विचारलं असता ते म्हणाले की, "एका जातीला दोष देण्यात अर्थ नाही. ब्राह्मण, मराठा, दलित सर्वांनी सर्वधर्म समभावाची पूजा केली पाहिजे असं माझं मत आहे". कोणी जातीचा प्रश्न हाताळत असेल तर हे योग्य नाही. जाती धर्माचे राजकारण या देशात चालत नाही. त्यामुळे आता झालेल्या गोष्टी हातात घेऊन महाराष्ट्र चालणार नाही असंही ते म्हणाले.