पावसाळ्याचा हंगाम सुरु झाल्यापासून गेले अनेक दिवस रुसलेल्या पावसाने शुक्रवारी महाबळेश्वरात पुन्हा बरसण्यास सुरुवात केली. यामुळे या भागात  सर्वत्र समाधानाचे वातावरण असून शेतकऱ्यांच्या आशा पुन्हा पल्लवित झाल्या  आहेत.
महाबळेश्वरचा पाऊस जसा शहराच्या  व तालुक्याच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे तितकाच तो संपूर्ण महाराष्ट्राच्या दृष्टीनेही महत्त्वाचा आहे. येथे पाच नद्यांचा उगम आहे तसेच येथे पडणाऱ्या पावसावरच पाच धरणांचे भवितव्य अवलंबून असते. कृष्णेवरील धोम बलकवडी ,धोमच्या जलाशयाचा साठा,वेण्णावरील -कण्हेर जलाशय,कोयनेवरील -कोयना जलाशयातील साठा ,सावित्रीवरील जलाशयाचा साठा ,तसेच महुतेघर जलाशयातील साठा या  जलाशयातील साठ्यासाठी महाबळेश्वरच्या पावसाची नितांत आवश्यकता आहे .त्या दृष्टीने येथील पावसास विशेष महत्त्व आहे. या वर्षी जूनमधील तीनचार दिवसांचा अपवाद सोडला तर संपूर्ण  महिनाभर तसा पाऊस पडलाच नाही.  १५ जून रोजी ३५.६ मि.मी. १६ रोजी -४३.६ ,१७ रोजी ३१.९ ,१९ रोजी-३४.६ , २० रोजी ३२.४ असा पाऊस पडला. जूनअखेर केवळ २१६ मि.मी पर्यंतच मजल पावसाने मारली. हीच काहीशी परिस्थिती जुल ९ तारखेपर्यंत राहिली. जूनच्या आकडेवारीत केवळ ११५ मि.मी ची भर घालून ९ जुल पर्यंत तो ३३०  मि.मी. पर्यंत पोहोचला.गतवर्षी तो २५००  मि.मी. पर्यंत झाला होता. यामुळे यावर्षी सगळ्यांच्या  तोंडचे  पाणीच पळाले होते. गुरुवारपासून पावसास सुरुवात झाली. आज तर येथे दिवसभर पावसाची संततधार होती. हवामानखात्याच्या नोंदीनुसार २४ तासात  येथे सुमारे ४०  मि.मी पाऊस झाला, तर आज दिवसभरात ९ तासात  त्याने ५६  मि.मी इतकी  नोंद केली. त्यानंतरही पाऊस पडत राहिला त्यामुळे समाधानाचे वातावरण पुन्हा पहावयास मिळत आहे.