बीड : करोना विषाणू बाधितांची आटोक्यात आलेल्या संख्येत पुन्हा मोठी वाढ होऊ लागली आहे. शुक्रवारी दिवसभरात २९५ नवीन रुग्णांची नोंद झाली असून तीन दिवसांमध्ये तब्बल साडेसातशे बाधित आढळले आहेत. बाधितांचे प्रमाण १२.३९ टक्क्यांवर गेले असून सध्या १ हजार १२९ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. यामध्ये सौम्य लक्षणे असलेल्या रुग्णांचाच अधिक समावेश आहे. जिल्ह्यात शुक्रवारी प्रशासनाला प्राप्त २ हजार ३८१ अहवालात २९५ करोनाबाधित आढळले आहेत. त्यामध्ये बीड तालुक्यात सर्वाधिक ११३, परळी ५९, अंबाजोगाई ३६, आष्टी १३, धारुर ११, केज २०, माजलगाव १८, गेवराई ९, पाटोदा ३, शिरुर ७ तर वडवणी तालुक्यातील सहा रुग्णांचा समावेश आहे. नागापूर (ता. बीड) या गावात एकाच वेळी तेरा जणांना करोनाची लागण झाली आहे. ग्रामीण भागातील रुग्णवाढ आरोग्य यंत्रणेसाठी चिंतेचा विषय ठरू लागली आहे. तीन दिवसांपासून सातत्याने रुग्णवाढ होऊ लागली असून तब्बल साडेसातशे बाधित आढळून आले आहेत. सध्या १ हजार १२९ रुग्णांवर ठिकठिकाणचे रुग्णालय, कोविड काळजी केंद्रात उपचार सुरू आहेत. रुग्ण वाढत असल्याने आरोग्य यंत्रणेने सामाजिक न्याय विभागाचे वसतिगृह ताब्यात घेतले असुन त्या ठिकाणी कोविड काळजी केंद्र सुरू करण्यात आले आहे. जिल्ह्यात बाधितांचे प्रमाण १२.३९ टक्क्यांवर गेले आहे. करोनाच्या तिसऱ्या लाटेत तरुण वर्ग संसर्गाच्या विळख्यात सापडला असून मागील वीस दिवसांमध्ये निष्पन्न एकूण रुग्णांपैकी ३९ टक्के रुग्ण १८ ते ३५ वयोगटातील आहेत. विषाणू संसर्गापासून बचावासाठी प्रतिबंधात्मक लसीकरणही आवश्यक असून १८ ते ४५ वयोगटातील १४ लाख १४ हजार जणांनी करोना प्रतिबंधक मात्रा घेतली आहे. तर १५ ते १७ वयोगटातही ७५ हजारांपेक्षा अधिक युवकांचे लसीकरण करण्यात आले आहे. दहावी, बारावीचे वर्ग सुरू होणार राज्य शासनाने सोमवारपासून शाळा सुरू करण्यास परवानगी दिली असली, तरी स्थानिक प्राधिकरणला रुग्णसंख्येनुसार निर्णय घेण्याचे अधिकार दिले आहेत. या पार्श्वभूमीवर शुक्रवारी प्रशासनाची बैठक झाली. गेल्या तीन दिवसांत रुग्णसंख्या झपाटय़ाने वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने सतर्कतेची भूमिका घेत सोमवारपासून फक्त दहावी आणि बारावीचे वर्ग सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. अन्य वर्ग तूर्तास बंद ठेवण्यात येणार असून रुग्णसंख्या पाहून निर्णय घेण्यात येणार असल्याचे प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी अजय बहीर यांनी सांगितले.