देशभरात व्यापक प्रमाणात लसीकरण सुरू झाल्यानंतर दुसरीकडे करोनाची रुग्णसंख्या कमी होताना दिसू लागली आहे. नव्या बाधितांचा आकडा देखील कमी झाल्याचं दिसून आलं आहे. महाराष्ट्रामध्ये गेल्या २४ तासांमध्ये मृतांच्या आकड्यात काही प्रमाणात घट झाल्याचं दिलासादायक चित्र आहे. गुरुवारी राज्यात ५६ जणांचा करोनामुळे मृत्यू झाला होता. शनिवारी हे प्रमाण ५० वर आलं आहे. मात्र, असं असलं, तरी राज्याचा मृत्यूदर अजूनही २ टक्क्यांच्या वर म्हणजेच २.१२ टक्के इतका आहे. करोनामुळे राज्यात आजपर्यंत नोंद झालेल्या मृतांचा आकडा आता १ लाख ३९ हजार ११७ इतका झाला आहे.

दरम्यान, दुसरीकडे राज्यात सातत्याने रोज करोनातून बऱ्या होणाऱ्या रुग्णांची संख्या ३ हजारांच्या वर आहे. आज देखील बऱ्या झालेल्या रुग्णांचा आकडा ३ हजार १६४ इतका आहे. त्यामुळे आजपर्यंत करोनातून बऱ्या झालेल्या रुग्णांची संख्या ६३ लाख ७४ हजार ८९२ इतकी झाली आहे. त्यासोबतच रिकव्हरी रेट देखील ९७.२७ टक्के इतका आहे.

दरम्यान, आज राज्यात ३ हजार १०५ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्यातील एकूण करोनाबाधितांचा आकडा ६५ लाख ५३ हजार ९६१ इतका झाला आहे. त्यापैकी ३६ हजार ३७१ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.