राज्यातील करोनाच्या दुसऱ्या लाटेने हाहाकार केला होता. दरम्यान, करोना संसर्गाची दुसरी लाट ओसरताना दिसत आहे. दैनंदिन आढळणाऱ्या करोनाबाधितांच्या संख्येत आता मोठ्याप्रमाणावर घट झाली आहे. शिवाय, करोनातून बरे होणाऱ्यांची संख्या देखील वाढत आहे. करोनाबाधित रूग्णांची दररोजच्या मृत्यू संख्या देखील घटली आहे. आज २ हजार ०७८ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. राज्यात आजपर्यंत एकूण ६४ लाख २१ हजार ७५६ रुग्णांनी करोनावर मात केली आहे. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.४ टक्के एवढे झाले आहे.

आज राज्यात १ हजार ४८५ नवीन करोना  रुग्ण आढळले आहे. राज्यात आज रोजी एकूण २८ हजार ००८ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील करोना बाधित रुग्णांची एकूण संख्या ६५ लाख ९३ हजार १८२ झाली आहे. तर २७ करोना बाधित रुग्णांचा आज उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर २.१२ टक्के एवढा आहे.  

राज्यात आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ६,११,१६,३५३ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ६५,९३,१८२(१०.७९ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात २,०८,६१३ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर ९६१ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.  

राज्यात करोना संसर्गदर दोन टक्क्यांपेक्षा कमी

 राज्यातील नगर, सांगली, सातारा, सिंधुदुर्ग, रत्नागिरीत करोनाच्या सक्रिय रुग्णांची संख्या अधिक आहे. विदर्भ, मराठवाडय़ात फारसे रुग्ण नाहीत. सध्या  राज्यातील संसर्ग दर दोन टक्क्यांपेक्षा कमी असून ही दिलासादायक बाब असल्याचे आरोग्य विभागाच्या  संचालक  डॉ. अर्चना पाटील यांनी सांगितले.

लसीकरणाचा चांगला परिणाम दिसत आहे. आतापर्यंत जवळपास ६८ टक्के नागरिकांना पहिली मात्रा तर ३२ टक्के व्यक्तींना दोन्ही मात्रा दिल्या गेल्या आहेत. मुंबई, पुणे, भंडारा, रायगड अशा काही जिल्ह्यात ९० टक्क्यांहून अधिक लसीकरण झाले आहे. देशात तिसऱ्या बुस्टर मात्रेपर्यंत जाण्याची गरज भासणार नाही. सध्या विहित वयोगटात सर्वाना दोन मात्रा देण्यावर लक्ष केंद्रीत करण्यात आले आहे. दुसरीकडे संभाव्य तिसरी लाट लक्षात घेऊन तयारी केली जात आहे. या लाटेत दुसऱ्या लाटेच्या दीडपट बाधित होतील, असा अंदाज केंद्राकडून देण्यात आला. ते लक्षात घेऊन प्राणवायू, औषधे आदींची तयारी करण्यात आली. प्राणवायू व्यवस्थापनाबद्दल प्रशिक्षण देण्यात आले. काही महापालिका क्षेत्रात डेंग्यू व चिकुनगुनियाचा प्रादुर्भाव वाढल्याचे डॉ. पाटील यांनी मान्य केले.