|| हर्षद कशाळकर कादगपत्रांअभावी ४८९ दावे फेटाळले अलिबाग- राज्य आपत्ती निवारण निधीमधून करोनामुळे दगावलेल्या मृतांच्या वारसांना ५० हजार रुपयांची मदत दिली जाणार आहे. यासाठी ४ हजार ३१६ अर्ज जिल्हा प्रशासनाकडे प्राप्त झाले होते. यातील ४८९ अर्ज कागदपत्रांची पुर्तता न केल्याने फेटाळण्यात आले आहेत. रायगड जिल्ह्यात करोना मुळे ४ हजार ६१४ जणांचा मृत्यू झाला आहे. या सर्व मृतांच्या वारसांना शसनाकडून ५० हजार रुपयांची मदत दिली जाणार आहे. आत्ता पर्यंत ४ हजार ३१६ जणांच्या वारसांनी मदतीसाठी अर्ज दाखल केले आहेत. प्रस्तावांची छाननी पनवेल महानगर पालिका आणि जिल्हा शल्यचिकीत्सकांच्या मार्फत केली जात आहे. आत्तापर्यत यातील ३ हजार ३८९ अर्ज मंजूर करण्यात आले आहेत. त्यांना राज्य आपत्ती निवारण निधीतून मदत वाटपाचे काम सुरु करण्यात आले आहे. तर कागदपत्रांची पुर्तता न केल्याने ४८९ जणांचे प्रस्ताव फेटाळण्यात आले आहेत. ४३८ अर्ज सध्या छाननी प्रक्रीयेसाठी प्रलंबित आहेत. शासन आदेशाप्रमाणे प्रत्येकी ५० हजाराची रक्कम मिळू शकणार आहे. राज्य आपत्ती निवारण निधीतून ही रक्कम थेट मृतांच्या वारसांच्या खात्यात जमा केली जाणार आहे. यासाठी राज्यसरकारकडून एक पोर्टल विकसीत करण्यात आले आहे. यावर ऑनलाईन पध्दतीने अर्ज करता येणार आहे. याशिवाय ग्रामपंचायत कार्यालय आणि सेतू कार्यालयाच्या माध्यमातून मृतांच्या वारसांना अर्ज करता येणार आहे. यासाठी जिल्ह्याला २३ कोटी येवढ्या निधीची आवश्यकता भासणार आहेत. रायगड जिल्ह्यात गेल्या दोन वर्षात करोना २ लाख ०३ हजार ५४७ जणांना करोनाची लागण झाली होती. यापैकी १ लाख ८४ हजार ६०१ जण उपचारानंतर बरे झाले. ४ हजार ६१४ जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या मृतांच्या वारसांनाशासनाकडून प्रत्येकी ५० हजार रुपयांची मदत दिली जाणार आहे.