राज्यात आज दिवसभरात ३ हजार २३३ रूग्ण करोनातून बरे झाले असून, २ हजार ७४० नवीन करोनाबाधित आढळले आहेत. याशिवाय, २७ करोनाबाधित रूग्णांचा मृत्यू झाल्याची देखील नोंद झाली आहे. राज्यातील करोना संसर्गाची दुसरी लाट अद्याप पूर्णपणे ओसरलेली नाही. शिवाय, तिसऱ्या लाटेचा शक्यता देखील वर्तवली जात आहे. अजुनही दररोज नवीन करोनाबाधित आढळून येत असून, करोनाबाधित रूग्णांच्या मृत्यू संख्येतही भर पडतच आहे. तर, दररोज आढळणारी करोनाबाधितांची संख्या ही करोनातून बरे होत असलेल्यांच्या तुलनेत कधी कमी तर कधी जास्त आढळून येत आहे.

राज्यात आजपर्यंत एकूण ६३,०९,०२१ करोनाबाधित रूग्ण बरे होऊन घरी परतले. यामुळे राज्यातील रूग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट) ९७.०५ टक्के एवढे झाले आहे.

. आता राज्यातील करोनाबाधित रूग्णांची एकूण संख्या ६५,००,६१७ झाली आहे. आजपर्यंत राज्यात १३८१६९ करोनाबाधित रूग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर २.१२ टक्के एवढा आहे.

आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ५,६०,८८,११४ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ६५,००,६१७(११.५९ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात २,९९,१९२ व्यक्ती संस्थात्मक विलगिकरणात आहेत. तर १ हजार ८८३ व्यक्ती संस्थात्मक विलगिकरणात आहेत. राज्यात आज रोजी एकूण ४९,८८० अॅक्टिव्ह रूग्ण आहेत.

राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज चेन्नई येथे भेट देऊन Tamil Nadu Medical Services Corporation Ltd., (TNMSC) कामाची माहिती घेतली. तसेच राष्ट्रीय आरोग्य अभियान आणि आरोग्य व्यवस्थेंतर्गत राब‍विल्या जाणाऱ्या उत्तम उपाययोजनांचाही आढावा घेतला. राज्याच्या दृष्टीने योग्य असणाऱ्या उपाययोजनांचा अवलंब केला जाईल, राज्यातील वैद्यकीय साधनसामग्री आणि औषध पुरवठा अधिक जलद आणि सुसूत्र पद्धतीने होईल. यावेळी राष्ट्रीय आरोग्य अभियानाचे प्रकल्प संचालक डॉ.दारेज अहमद, उपायुक्त डॉ.मनिष आदी उपस्थित होते. अशी माहिती आरोग्यमंत्री टोपे यांनी ट्विटद्वारे दिली आहे.