मुंबई: राज्यात गेल्या काही दिवसांत आटोक्यात येत असलेला करोना प्रसार दिवसेंदिवस कमी होत असून उपचाराधीन रुग्णांच्या संख्येतही गेल्या महिनाभरात उत्तरोत्तर घट होत आहे. सध्या राज्यात ७२०९ रुग्ण उपचाराधीन असून गेल्या आठवडाभरात सुमारे ११ टक्क्यांनी घट झाली आहे.

नाताळच्या सुट्टीमुळे अनेक परदेशी प्रवासी गेल्या काही दिवसांमध्ये राज्यात येत असले तरी अजून नव्याने बाधित आढळणाऱ्या रुग्णसंख्येच्या आलेखामध्ये वाढ झाल्याचे आढळलेले नाही. १९ ते २५ नोव्हेंबर या आठवडय़ात राज्यात राज्यात ५ हजार ८१४ रुग्णांची नव्याने आढळले, तर गेल्या आठवडाभरात यात आणखी घट झाली असून ४ हजार ४९८ रुग्ण आढळले आहेत.

राज्यात उपचाराधीन रुग्णांच्या संख्येतही नोव्हेंबरपासून सातत्याने घट होत आहे. नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवडय़ापर्यत राज्यात १० हजार २२४९ रुग्ण उपचाराधीन होते. नोव्हेंबरच्या तिसऱ्या आठवडय़ात यात आणखी घट होत रुग्णांची संख्या सुमारे ८ हजारापर्यत कमी झाली तर गेल्या आठवडाभरात हे प्रमाण सात हजारांपर्यत कमी झाले आहे.

मुंबईत सर्वाधिक रुग्ण

राज्यात सर्वाधिक, १ हजार ९२३ उपचाराधीन रुग्ण मुंबईत असून त्या खालोखाल पुणे(१८७०), ठाणे(१०५७), नगर(८३३) आणि नाशिक(३२३) या जिल्ह्यांचा समावेश आहे. राज्यातील सुमारे ८० टक्के उपचाराधीन रुग्ण या जिल्ह्यांमध्ये आहेत.

चाचण्यांमध्ये काही प्रमाणात वाढ

केंद्राच्या आदेशानंतर राज्यातील दैनंदिन चाचण्यांचे प्रमाण पुन्हा वाढून एक लाखांच्या वर गेले आहे. संसर्गाचे प्रमाण कमी झाल्यामुळे नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवडय़ात राज्यातील चाचण्यांमध्ये मोठय़ा प्रमाणात घट होत दैनिदन चाचण्यांचा आलेख एक लाखांपेक्षाही खाली गेला होता. ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर चाचण्या वाढविण्याचे आदेश केंद्राने दिल्यानंतर राज्यात मागील दोन दिवसांत चाचण्यांचे प्रमाणही काही अंशी वाढले आहे.

चाचण्यांमध्ये वाढ होणे गरजेचे

चाचण्यांमध्ये मोठय़ा प्रमाणात वाढ होणे आवश्यक आहे. कारण जितक्या लवकर रुग्णांचे निदान केले जाईल तितक्या लवकर करोनाचा उद्रेक कोणत्या भागात होत असेल तर निर्दशनास येईल आणि आवश्यक उपाययोजना करणे शक्य होईल, असे करोना कृती दलाचे सदस्य डॉ. राहुल पंडित यांनी व्यक्त केले.