करोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर देशात लॉकडाउनचा निर्णय घेण्यात आला आहे. १४ एप्रिलपर्यंत म्हणजेच २१ दिवसांसाठी हा लॉकडाउन असणार आहे. “पुढील तीन आठवड्यात ही परिस्थिती निवळेलच असं नाही. आपल्याला पुढील तयारीही ठेवावीच लागेल,” असं मत अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केलं आहे.

करोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर संसर्ग रोखण्यासाठी लॉकडाउनचा निर्णय घेण्यात आला आहे. हे तीन आठवड्यात संपेल असं नाही. त्यामुळे आपल्याला पुढील तयारीही ठेवावीच लागेल, असं मत भुजबळ यांनी व्यक्त केलं. एका मराठी वाहिनीला त्यांनी मुलाखत दिली. त्यावेळी ते बोलत होते. तसंच यावेळी त्यांनी नागरिकांनाही काही प्रश्न विचारले. घरात तुम्ही किती वस्तूंचा साठा करून ठेवणार आहात, असा सवालही त्यांनी केला. तसंच अन्नधान्य औषधं यांचा साठा करण्याची गरज नाही. त्या योग्य त्या ठिकाणी पोहोचवण्यासाठी खबरदारी सरकार घेणार असल्याच आश्वासनही त्यांनी दिलं.

आणखी वाचा- मुंबई: प्रभादेवीत फेरीवाल्याला करोना व्हायरसची लागण

राज्यात पुढील सहा ते आठ महिने पुरेल इतका अन्नधान्याचा साठा आहे. राज्यात अजिबात तुटवडा नाही. पंतप्रधानांच्या घोषणेनंतर काही मिळणार नाही म्हणून लोक बाहेर पडले. दुकानांसमोर लोकांनी रांगा लावल्या. त्यामुळे नंतर त्यांना दुकानं रिकामी दिसली. वितरण आणि पुरवठ्याची एक व्यवस्था असते. तो २४ तास सुरू नसतो, असंही त्यांनी स्पष्ट केलं. करोनासोबतच्या लढ्यात लढत असताना आपल्याला काही गोष्टींचा सामना करावा लागू शकतो. परंतु अत्यावश्यक वस्तूंचा पुरवठा करण्यासाठी सरकार कटिबद्ध असल्याचं त्यांनी सांगितलं.