अमरावती : पश्चिम विदर्भात कापसाच्या वेचणीला वेग आलेला असताना प्रति क्विंटलमागे किमान ८ हजार तर, कमाल दराने ९ हजार रुपयांचा टप्पा कापसाने ओलांडला आहे. दरम्यान, बाजारपेठेत कापसाची आवक कमी आहे. त्यामुळे कापसाला सरासरी ९ हजार रुपयांपर्यंत दर मिळू शकतो, असा अंदाज वर्तवला जात आहे. सध्या उद्योगांकडून कापसाला उठाव मिळत आहे, त्यामुळे त्याचे दर गेल्या काही दिवसांपासून वाढलेले दिसत आहेत. काही बाजार समित्यांमध्ये कापसाच्या दरात सुधारणा पाहायला मिळाली; पण सर्वसाधारणपणे दर स्थिर होते. बहुतांशी राज्यातील कापसाचा किमान दर ८ हजार रुपयांवर पोहोचला होता. तर कमाल दराने ९ हजार रुपयांचा टप्पा पार केला होता. सरकीच्या दरातही काही बाजारांमध्ये गेल्या आठवडय़ात सुधारणा झाली होती. सरकारचा किमान दर आता ३ हजार ७०० रुपयांवर पोहोचला, तर कमाल दराने ४ हजारांची पातळी गाठली आहे. काही बाजारांमध्ये ४ हजार ५०० रुपयांचा दर मिळाला; पण सरासरी दर यापेक्षा कमी होता. बाजारात सध्या कापसाचे दर वाढत आहेत; मात्र त्या प्रमाणात आवक वाढलेली दिसत नाही. पुढील काही दिवस शेतकऱ्यांना कापसासाठी सरासरी ९ हजार रुपये दर मिळू शकतो. त्यामुळे बाजाराचा आढावा घेऊनच विक्री फायदेशीर ठरेल, असे जाणकारांचे म्हणणे आहे. शेतकऱ्यांना गेल्या हंगामात विक्रमी भाव मिळाला; परंतु यंदा तसा भाव मिळण्याची स्थिती नाही. देशातील कापूस उत्पादनात वाढ झाली असून जागतिक बाजारपेठेत भाव खाली आले आहेत, असे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे. गेल्या जूनमध्ये कापसाला उच्चांकी दर मिळाला होता. त्या वेळी जागतिक बाजारपेठेतही दर चढे होते; परंतु आता जूनच्या तुलनेत देशात कापसाच्या दरात ४० टक्के घट झाली आहे. प्रतीक्षा भाववाढीची.. गेल्या वर्षी शेतकऱ्यांनी १० हजार ते १५ हजार रुपये दराने कापूस विकला. सध्या ८ ते ९ हजार रुपये भाव मिळत आहे. त्यामुळे शेतकरी भाववाढीची वाट पाहत आहेत. यंदा कापसात गेल्या वर्षी इतकी तेजी येण्याची शक्यता दिसत नाही, असे बाजार विश्लेषकांचे मत आहे. जगभरात वस्त्रोद्योग क्षेत्रात मंदीचे वातावरण असल्याने कापसाला मागणी घटली आहे. भारतातून निर्यात होणाऱ्या कापसापैकी ५० टक्के कापूस बांगलादेशला जातो. इतर खरेदीदार देशांमध्ये चीन, व्हिएतनाम, थायलंड आणि इंडोनेशिया यांचा समावेश होतो. बांगलादेश संकटाचा सामना करत असून तिथून कापसाला मागणी कमी असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे.