चंद्रपुरातील प्रकार, राज्य महिला आयोगाकडे तक्रार चंद्रपूर : शहरातील आठ महिला डॉक्टरांनी एकत्र येत चंद्रपुरात सुरू केलेल्या टेस्ट टय़ूब बेबी सेंटरचे संचालन आर्थिक लोभाला बळी पडून पुण्यातील एका डॉक्टरच्या कंपनीकडे सोपवण्यात आले. पुण्यातील या संबंधित डॉक्टरच्या कंपनीने अपत्य नसलेल्या शेकडो महिलांवर उपचार केले. मात्र त्याचा काही एक फायदा झाला नाही, उलट आरोग्यावर विपरीत परिणाम झाला व आर्थिक लुबाडणूक झाली. या गंभीर प्रकरणाची तक्रार थेट राज्य महिला आयोगाकडे झाल्याने वैद्यकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे. चंद्रपुरातील रामनगर परिसरातील एका खासगी रुग्णालयात शहरातील आठ महिला स्त्रीरोग तज्ज्ञांनी एकत्र येत २०१० मध्ये टेस्ट टय़ूब बेबी सेंटर सुरू केले. या टेस्ट टय़ूब बेबी सेंटरची नियमानुसार नोंदणीही करण्यात आली. त्यानंतर या केंद्रात अपत्य नसलेल्या महिलांवर उपचार सुरू झाले. काही वर्षांतच हे सेंटर चालवणाऱ्या आठ महिला डॉक्टरांनी स्वत:चे स्वतंत्र केंद्र सुरू करण्याचा निर्णय घेतला. मात्र रामनगरातील या केंद्राची नोंदणी त्यांनी रद्द केली नाही व नंतर ते केंद्र पुण्याच्या एका नामांकित कंपनीच्या सुपूर्द केले. त्यानुसार चंद्रपुरातील एका डॉक्टरचा नातेवाईक असलेल्या पुण्यातील एका डॉक्टरच्या कंपनीकडे सर्व अधिकार सोपवण्यात आले. विशेष म्हणजे, पुण्यातील ज्या व्यक्तीकडे हे केंद्र सोपवण्यात आले त्याच्याकडे केंद्र संचालित करण्याचा अनुभव किंवा वैद्यकीय शिक्षण नव्हते. पुण्यातील या व्यक्तीने केंद्र सुरू करताच तेथील अपत्य नसलेल्या महिलांची माहिती गोळा केली. त्यांच्याशी ई मेल तथा फोनच्या माध्यमातून संपर्क साधला. हळूहळू गर्दी वाढली. निपुत्रिक दाम्पत्यांकडून चार ते पाच लाख शुल्क आकारण्यात आले. दरम्यान, या केंद्रात उपचार केल्यानंतरही पुत्रप्राप्ती होत नाही, उलट औषधांमुळे आरोग्यावर विपरीत परिणाम होत आहेत ही बाब अनेक दाम्पत्यांच्या निदर्शनास आली. काही दाम्पत्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र वैद्य यांची भेट घेतली. वैद्य यांनी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्याकडे तक्रार केली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला जिल्हाध्यक्ष बेबी उईके यांनीही या प्रकरणाची तक्रार राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रूपाली चाकणकर यांच्याकडे केली. राज्य महिला आयोगाने हे प्रकरण गांभीर्याने घेऊन चौकशी सुरू केली आहे.