बीड : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याविरोधात परळी न्यायालयाने अजामीन पात्र वॉरंट जारी केले. जामीन मिळाल्यानंतरही न्यायालयात सातत्याने गैरहजर राहिल्याप्रकरणी हे वॉरंट बजाविण्यात आले आहे. राज ठाकरे यांना ऑक्टोबर २००८ मध्ये मुंबईत अटक करण्यात आली होती. त्याचे पडसाद राज्यभरात उमटले. ठिकठिकाणी तोडफोडीचे प्रकार घडले. परळीतील धर्मापुरी पॉईंटवर एसटीवर दगडफेक करण्यात आली. यात मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले होते. या  घटनेनंतर जमावबंदी आदेशाचे उल्लंघन, सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान आणि चिथावणीखोर वक्तव्य प्रकरणी राज ठाकरे यांच्यासह मनसेच्या अनेक कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल झाले होते. परळी पोलीस ठाण्यातही गुन्हा दाखल झाला होता. या प्रकरणात तपास पूर्ण करून न्यायालयात आरोपपत्र दाखल करण्यात आल्यानंतर राज ठाकरे आणि कार्यकर्त्यांना जामीन मंजूर झाला आहे. मात्र न्यायालयात सतत गैरहजर राहिल्याप्रकरणी न्यायालयाने राज ठाकरे यांच्या विरुध्द अजामीनपात्र वॉरंट बजावले आहे.