राज्यातल्या गेल्या काही दिवसातल्या वाढत्या करोना रुग्णसंख्येचा आढावा घेतल्यास आपल्याला लक्षात येतं की राज्यात मुंबईमध्ये सर्वाधिक दैनंदिन रुग्ण आढळून येत आहेत. मात्र आता या रुग्णांमध्ये घट दिसू लागली आहे. पण तरीही राज्यातली एकूण आकडेवारी पाहता परिस्थिती फारशी चांगली म्हणता येणार नाही. राज्यात आजही ४० हजारांपेक्षा जास्त रुग्णांची नोंद झाली आहे. राज्याच्या आरोग्य विभागाने दिलेल्या आकडेवारीनुसार, रविवारी राज्यात ४१ हजार ३२७ नव्या रुग्णांची भर पडली आहे. तर २९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. दिलासादायक बाब म्हणजे आज राज्यात ४०,३६८ रुग्णांनी करोनावर मात केली आहे. त्यामुळे करोनामुक्त रुग्णाची संख्या ६८,००,९०० इतकी झाली आहे. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९४.३% एवढे झाले आहे. आज राज्यात ८ ओमायक्रॉन बाधित रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे राज्यातल्या एकूण ओमायक्रॉन बाधितांची संख्या १,७३८ झाली आहे. त्यापैकी ९३२ रुग्णांनी ओमायक्रॉनवर मात केली आहे. मुंबईतील आजची रुग्णसंख्या मागील काही दिवसांच्या तुलनेत दिलासादायक आहे. मुंबईत मागील २४ तासांत ७,८९५ नवे करोनाबाधित आढळले असून जवळपास याहून तीनपटीने अधिक म्हणजेच २१,०२५ रुग्ण करोनामुक्त झाले आहेत.