राज्यात दररोज आढळणाऱ्या करोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस कमीकमी होताना दिसत आहे. यावरून करोनाची दुसरी लाट ओसरत असल्याचे बोलले जात आहे. शिवाय, करोनामधून बरे होणाऱ्यांची संख्या देखील वाढत असल्याने, राज्याचा रिकव्हरी रेट देखील हळूहळू वाढत आहे. राज्यात आज दिवसभरात २ हजार ८९५ रूग्ण करोनामधून बरे झाले असून, २ हजार ४३२ नवीन करोनाबाधित आढळले आहेत. याशिवाय, ३२ करोनाबाधित रूग्णांचा मृत्यू झाल्याची देखील नोंद झाली आहे. राज्यात आजपर्यंत एकूण ६३,६२,२४८ करोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट) ९७.२६ टक्के एवढे झाले आहे. आता राज्यातील करोना बाधित रुग्णांची एकूण संख्या ६५,४१,७६२ झाली आहे. राज्यात आजपर्यंत १३८९०२ करोनाबाधित रूग्णांचा मृत्यू झालेला आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर २.१२ टक्के एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ५,८२,८६,०३६ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ६५,४१,७६२ (११.२२ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात २,५७,१४४ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर १,५१७ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आज रोजी एकूण ३७,०४३ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.