मतदारांना दारू प्या, पसे घ्या असे आवाहन करताना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना लाज कशी वाटली नाही? दारूमुळेच अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले. पण निवडणुकीत गडकरी मिळेल ते प्या, खा अशी भाषा वापरतात, हे कशाचे लक्षण? असा सवाल खासदार सुप्रिया सुळे यांनी केला.
लातूर ग्रामीणमधील राष्ट्रवादीच्या उमेदवार आशा भिसे यांच्या प्रचारार्थ लातूर तालुक्यातील बोरगाव काळे येथे आयोजित सभेत त्या बोलत होत्या. भ्रष्टाचारी, गुंड असा भाजपनेच ज्यांच्यावर आरोप केला होता, त्यांच्याच प्रचारार्थ मोदी राज्यात फिरत आहेत. ते कोणाला पाठीशी घालत आहेत? असा प्रश्न उपस्थित करून सुळे यांनी विकासच पाहायचा असेल तर बारामतीला या, असे आव्हान दिले. काँग्रेस नेते विलासराव देशमुख यांची आठवण काढत ते असते तर आघाडी तुटली नसती, असे सांगून माजी मंत्री अमित देशमुख आपले लहान बंधू आहेत. विलासरावांच्या निधनानंतर काँग्रेसने त्यांना तातडीने मंत्रिमंडळात घ्यायला हवे होते, पण त्यांना अकारण लटकवत ठेवले, असेही सुळे म्हणाल्या.