scorecardresearch

राजापूर रिफायनरी समर्थकाविरोधात बातमी दिलेल्या पत्रकाराला त्याच दिवशी गाडीने उडवले; गाडी चालकाविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल

मुंबई गोवा महामार्गावरील राजापूर येथे झालेल्या अपघातात पत्रकार शशिकांत शंकर वारीशे (वय ४५ वर्षे, रा. कशेळी) गंभीर जखमी झाले होते.

journalist hit by car in ratnagiri
फोटो – द इंडियन एक्सप्रेस

सोमवारी मुंबई गोवा महामार्गावरील राजापूर येथे रत्नागिरीतील पत्रकार शशिकांत शंकर वारीशे (वय ४५ वर्षे, रा. कशेळी) यांचा अपघात झाला होता. या अपघातात ते गंभीर जखमी झाले होते. अपघातानंतर त्यांना कोल्हापूर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, मंगळवारी पहाटे उपचारादरम्यान त्यांचं मृत्यू झाला. दरम्यान, अपघात होता की घातपात, याबाबत चर्चा सुरू असताना राजापूर रिफायनरी समर्थकाविरोधात बातमी दिल्यानेच त्यांचा अपघात घडवून आणण्यात आला, अशी माहिती पुढे आली आहे.

याप्रकरणी चारचाकी गाडीचा चालक पंढरीनाथ विद्याधर आंबेरकर (रा. राजापूर) याच्या विरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला असून त्याला अटक करण्यात आली आहे.

हेही वाचा – “मुख्यमंत्र्यांना गल्ली-गल्लीत फिरायला लावणार” म्हणणाऱ्या आदित्य ठाकरेंना शिंदे गटाचं प्रत्युत्तर; म्हणाले, “गल्लीत फिरणे म्हणजे…”

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वारीशे यांनी राजापूर रिफायनरीचे समर्थक असलेल्या पंढरीनाथ आंबेरकरविरोधात स्थानिक वृत्तपत्रात एक वृत्त प्रकाशित केले होते. “मोदीजी, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या बॅनरवर गंभीर गुन्ह्यातील आरोपीचे फोटो” अशा आशयाचे ते वृत्त होते. त्यानंतर वारीशे यांनी ही बातमी सोशल मीडियावर शेअर केली होती.

हेही वाचा – Virginity Test: “सत्य जाणून घेण्याच्या नावाखाली महिलांची कौमार्य चाचणी केली जाऊ शकत नाही”, १९९२ च्या ‘त्या’ प्रकरणात न्यायालयानं CBI ला फटकारलं!

दरम्यान, दुपारी शशिकांत वारीशे मुंबई गोवा महामार्गावरून जात असताना राजापूर येथे पेट्रोल पंपाजवळ एका एसयुव्हीने त्यांना जोरदार धडक दिली. या अपघातात वारीशे गंभीर जखमी झाले. स्थानिकांच्या मदतीने त्यांना तत्काळ राजापूर ग्रामीण रूग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, प्रकृती खालावत असल्याने त्यांना आधी कोल्हापूर येथील सीपीआर रुग्णालयात, त्यानंतर सिटी हॉस्पिटल येथे हलविण्यात आले. मात्र, उपचार सुरू असताना मंगळवारी पहाटे त्यांचा मृत्यू झाला.

हेही वाचा – “मुख्यमंत्र्यांना गल्ली-गल्लीत फिरायला लावणार” म्हणणाऱ्या आदित्य ठाकरेंना शिंदे गटाचं प्रत्युत्तर; म्हणाले, “गल्लीत फिरणे म्हणजे…”

वारीशे यांच्या नातेवाईकांनी हा अपघात नसून घातपात असल्याचा संशय व्यक्त केला होता. शशिकांत वारीशे यांचे मेहुणे अरविंद दामोदर नागले (रा.तेलीआळी, रत्नागिरी) यांनी दिलेल्या तक्रारीनंतर गाडीचालक पंढरीनाथ विद्याधर आंबेरकर (रा. राजापूर) याला अटक करण्यात आली. त्याला राजापूर न्यायालयात हजर केले असता १४ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 08-02-2023 at 10:50 IST

संबंधित बातम्या