अहिल्यानगर: सायबर गुन्हेगारांना महिन्याच्या मोबदल्यावर स्वतःच्या नावाने उघडलेली बँक खाती वापरण्यास देऊन ऑनलाइन फसवणुकीस मदत केल्याप्रकरणी श्रीरामपूरमधील ५ जणांना दिल्ली सायबर क्राईम पोलिसांनी अटक केली आहे. या खात्यांमार्फत सुमारे १३ लाख रुपयांची ऑनलाइन फसवणूक झाल्याचा गुन्हा दिल्ली येथे दाखल असून, पाचही आरोपींना ७२ तासांच्या ‘ट्रान्झिट वॉरंट’वर आज, गुरुवारी श्रीरामपूरमधून दिल्लीला नेण्यात आले.

दिल्ली सायबर पोलिसांनी श्रीरामपूरमध्ये दिलेल्या माहितीनुसार या प्रकरणी ४ सप्टेंबर २०२५ रोजी बीएनएस कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. श्रीधर दिलीप इंगळे, अर्चियन गोरख कांबळे, अजिज मीरान शेख, प्रणव जालिंदर गुलदगड, विशाल दुर्गादास बाचल (सर्व रा. श्रीरामपूर, अहिल्यानगर) यांना अटक करण्यात आली.

दिल्ली पोलिसांच्या माहितीनुसार, या आरोपींनी स्वतःच्या तसेच इतरांच्या नावाने बँक खाती उघडून ती सायबर गुन्हे करणाऱ्या टोळीला “मंथली रेंट बेसिस” वर वापरण्यास दिली. या खात्यांद्वारे ऑनलाइन फसवणूक करून पैशांची अफरातफर करण्यात आल्याचा आरोप आहे. दिल्ली पोलिसांनी सादर केलेल्या ‘ग्राऊंड ऑफ अरेस्ट’ नुसार, विशाल बाचल याने सहआरोपी श्रीधर इंगळे याच्यासह काही व्यक्तींची कॅनरा बँक व बँक ऑफ महाराष्ट्र येथे खाती उघडून ती ‘चैतन्य’ नावाच्या व्यक्तीकडे वापरण्यास दिल्याचा संशय आहे. त्याच्या मोबाईलमध्येही संशयास्पद संपर्क व डिजिटल पुरावे सापडल्याचे नमूद करण्यात आले आहे. या प्रकरणात आणखी आरोपींचा सहभाग असण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.

आरोपींच्या वतीने ॲड. आरिफ शेख, सौरभ गादीया, साजेब शेख व अभीजीत शेळके यांनी बाजू मांडताना, संबंधित कलमांनुसार शिक्षा ७ वर्षांपेक्षा कमी असल्याने अटक कारवाई योग्य नसल्याचा युक्तिवाद केला. मात्र, आरोपींना दिल्ली न्यायालयात हजर करणे आवश्यक असल्याने येथील सत्र न्यायालयाचे न्यायाधीश जितेंद्र जाधव यांनी दिल्ली सायबर क्राईम पथकाची ७२ तासांच्या ‘ट्रान्झिट वॉरंट’ची मागणी मंजूर केली. यानंतर दिल्ली पोलिसांचे पथक पाचही आरोपींना ताब्यात घेऊन दिल्लीकडे रवाना झाले.

अशा स्वरूपाची कारवाई अहिल्यानगर जिल्ह्यात प्रथमच झाली आहे. सायबर गुन्हेगारांकडून ऑनलाईन फसवणुकीचे प्रकार वाढले आहेत. जिल्ह्यात रोज असे प्रकार उघडकीस येत आहेत. यामध्ये बळी पडणाऱ्यात सुशिक्षितांची संख्या अधिक आहे. ‘डिजिटल अरेस्ट’ केल्याचे सांगून फसवणूक करण्याचे, रक्कम लुबाडण्याचे प्रकारही वाढले आहेत. परंतु सायबर गुन्हेगारांना भाडेतत्त्वावर बँक खाते वापरण्यास देण्याचा प्रकार जिल्ह्यात प्रथमच उघडकीस आला आहे.