निरोगी आरोग्य व इंधनबचतीसाठी सायकल चालविण्याशिवाय गत्यंतर नाही हे पटवून देण्यासाठी खा. सुप्रिया सुळे यांच्या प्रमुख उपस्थितीत शनिवारी येथे यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानचे विभागीय केंद्र व इतर संघटनांच्या वतीने जनजागृतीपर सायकल फेरीचे आयोजन करण्यात आले आहे. जीवनशैली आणि आहारातील बदलांमुळे आरोग्याचे व्यवस्थापन डळमळीत होते. यावर पर्यावरण संतुलन हा उपाय आहे. त्यासाठी सायकल चालविणे विविध प्रकारे फायदेशीर आहे. थेट फायदा म्हणजे इंधनाची मोठय़ा प्रमाणावर बचत होय. प्रदूषणावरही आळा घालणे शक्य होते. शरीरातील अतिरिक्त चरबीचा नाश होतो. रक्तातील कोलेस्ट्रॉलचे प्रमाण योग्य राहते. वजन वाढत नाही. हात-पाय, पाठ, गुम्डघे यांना बळकटी मिळते. त्यामुळेच सायकलीचा वापर किती आवश्यक आहे हे रुजविण्यासाठी खा. सुप्रिया सुळे या येथे आयोजित सायकल फेरीत सहभागी होणार आहेत. शनिवारी सकाळी सात ते साडेआठ या वेळेत ही सायकल फेरी गोल्फ क्लब, वेद मंदिर, मायको सर्कल, रिमांड होम, सिटी सेंटर मॉल, खेतवानी लॉन्स, त्रिमूर्ती चौक, पवननगर, उत्तमनगर चौक पुन्हा पवननगर बसस्टॉप, दिव्या अ‍ॅडलॅब, वेद मंदिर, स्वातंत्र्यवीर सावरकर तरण तलावाच्या सिग्नलवरून फिरत गोल्फ क्लब यामार्गे एकूण अंदाजे १० किलोमीटरचे अंतर कापणार आहे. या सायकल फेरीत अधिकाधिक संख्येने सामील होण्याचे आवाहन यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या विभागीय केंद्राचे कोषाध्यक्ष विशॉवास ठाकूर, डॉ. अनिरुद्ध धर्माधिकारी, डॉ. सुधीर संकलेचा, डॉ. राज नगरकर आदींनी केले आहे.