तौते चक्रीवादळाचा कोकणाला मोठा फटका बसलेला असून मच्छिमार तसंच शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे. चक्रीवादळामुळे दर्याला उधाण आलं असून अनेक ठिकाणी किनाऱ्यावर उभ्या नौकांना फटका बसला आहे. देवगड तालुक्यातील आनंदवाडी बंदर येथे नांगरून ठेवलेल्या दोन बोटी वाहून गेल्याने बुडाल्या आहेत. तर एका खलाशाचा मृत्यू झाला आहे. डीजीआयपीआरने दिलेल्या माहितीनुसार, राजाराम कृष्णा कदम असं या खलाशाचं नाव असून तिघे बेपत्ता आहेत.

दिनानाथ जोशी, नंदकुमार नार्वेकर, प्रकाश गिरीद हे बेपत्ता आहेत. दरम्यान काही जण सुदैवाने बचावले असून सुखरुप बाहेर आले आहेत. देवगड उपविभागीय अधिकारी सुधीर पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, दुपारी साडे तीन वाजण्याच्या सुमारास आंनदवाडी बंदर येथे नांगरून ठेवलेल्या रघुनाथ यशवंत कोयंडे यांच्या रुक्मिणी या बोटीच्या इंजिनमध्ये बिघाड झाल्यामुळे ती पाण्याच्या जोरदार प्रवाहामुळे, वाहून जाऊ लागली. त्यामुळे रुक्मिणी बोटीवरील खलाशांना वाचवण्यासाठी निरज यशवंत कोयंडे यांची आरची नावाची दुसरी बोट रुक्मिणी बोटी जवळ नेण्यात येत होती. पण, वादळी वाऱ्यामुळे आरची बोटीवरील खलाशांचे नियंत्रण सुटून दोन्ही मच्छिमार बोटी लगतच्या मौजे पालये किनाऱ्यावरील खडकावर आदळल्या. त्यानंतर दोन्ही बोटीवरील खलाशांनी पाण्यात उड्या मारल्या. या दोन्ही बोटींवर मिळून एकूण सात खलाशी होते. यापैकी तीन खलाशी सुखरूप बाहेर आले. तर चार खलाशी वाहून गेले. यापैकी एका खलाशाचा मृतदेह आज सकाळी देवगड मळई येथील खाडीमध्ये आढळून आला आहे. स्थानिक प्रशासकीय यंत्रणा व स्थानिक लोकांच्या सहकार्याने इतर तीन बेपत्ता खलाशांचा शोध सुरू आहे. तसेच या दुर्घटनेनंतर उपविभागीय अधिकारी ( महसूल ) यांनी बचावलेल्या खलांशांची भेट घेतली.