मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या दसरा मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर मुंबईमध्ये दोन्ही गटांकडून शक्तिप्रदर्शन केलं जात आहे. दोन्ही गटांनी या दसरा मेळाव्याची जोरदार तयारी सुरु आहेत. महाराष्ट्रातील वेगवेगळ्या भागांमधून दोन्ही गटातील समर्थक या मेळाव्यांसाठी मुंबईमध्ये दाखल होणार आहेत. अनेक ठिकाणांहून आजच खासगी बस आणि गाड्यांमधून कार्यकर्ते रवाना झाले आहेत. असं असतानाच उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या मेळाव्यांच्या पार्श्वभूमीवर कायदा आणि सुव्यवस्थेसंदर्भातील एक चिंता व्यक्त केली आहे.

ठाण्यामध्ये टेंभी नाक्यावरील देवीचं दर्शन घेतल्यानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. “मी मातेचं दर्शन घेतलं आहे. आईला एवढेच मागणं मागितीलं आहे. महाराष्ट्र चिंतामुक्त कर. ज्या काही समस्या आहेत त्या दूर करण्यासाकरता शक्ती दे. तुझे आशिर्वाद पाठिशी असू दे. एकनाथ शिंदे आणि मी शिवसेना-भाजापाचं सरकार तयार केलं आहे. त्या सरकारच्या माध्यमातून लोकहिताचं काम करण्यासाठी आईकडे शक्ती मागितली आहे,” असं फडणवीस यांनी म्हटलं.

मुंबई होणाऱ्या दसरा मेळाव्यांच्या पार्श्वभूमीवर फडणवीस यांना कायदा-सुव्यवस्थेसंदर्भातील प्रश्न विचारण्यात आला. दसरा मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर हजारो लोक मुंबईत येण्याची शक्यता आहे. कायदा सुव्यवस्थेची कशी तयारी आहे? असं गृहमंत्र्यांना पत्रकारांनी विचारलं. या प्रश्नाला उत्तर देताना फडणवीस यांनी मुंबईत येणाऱ्या लोकांच्या संख्येपेक्षा अधिक चिंता एका वेगळ्याच गोष्टीची वाटत असल्याचं नमूद केलं. “कायदा सुव्यवस्था आम्ही नीट ठेऊ. मोठ्या प्रमाणात लोक येत असताना त्या लोकांपासून मला कुठलीही अडचण वाटत नाही. गर्दीचा फायदा घेऊन कोणी चुकीचं काम करु नये याची आम्ही काळजी घेऊ,” असं फडणवीस म्हणाले.