मराठी भाषेचा प्रचार आणि प्रसार जगभरात व्हावा यासाठी राज्य सरकारतर्फे विश्व मराठी संमेलनाचे आयोजन मुंबईतील वरळी येथे करण्यात आले आहे. 'मराठी तितुका मेळवावा' हे विश्व मराठी संमेलनाचे घोषवाक्य आहे. या संमेलनाच्या उदघाटनप्रसंगी बोलत असताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, "मराठी भाषा जतन आणि संवर्धन करण्यासाठी सरकार प्रयत्न करत आहेच. या कामाला लोकचळवळीचे स्वरुप प्राप्त झाल्यास या कामात आणखी गती येईल. तसेच लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे साहित्य जसे रशियात पोहोचले, तशाप्रकारे इतर साहित्यिकांचे साहित्यही इतर भाषांमध्ये अनुवादित व्हायला हवे." अण्णाभाऊ साठेंची ख्याती रशियात पोहोचली देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "मराठी केवळ एक भाषा नाही. ही एक अभिव्यक्ती असून ती विश्वाला कल्याणाचा विचार देते. मराठीतील अनेक साहित्यिकांनी अनेक गोष्टी लिहिल्या, त्या वैश्विक देखील झाल्या. जगातल्या विविध भाषांमधील साहित्य मराठीत अनुवादित झाले, त्याप्रकारे मराठीतील साहित्य जगातील इतर भाषांमध्ये अनुवादित होऊ शकले नाही. खरंतर लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना शाळेत शिकायला मिळाले नाही. पण त्यांनी अशाप्रकारचे साहित्य लिहिले की त्यांची जगभर ओळख झाली. रशियाच्या स्टेट लायब्ररीमध्ये लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंचा पुतळा बसविण्यात आला आहे. रशियामध्ये अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्यावर संमेलन झालेले पाहायला मिळाले." हे ही वाचा >> Photos: रशियाच्या राजधानीत लोकशाहीर अण्णा भाऊ साठेंचा पुतळा; हे फोटो पाहून नक्कीच तुमचाही ऊर अभिमानाने भरुन येईल सावरकरांनी मराठी भाषेला हजारो शब्द दिले "मराठी भाषा समृद्ध करण्यासाठी स्वातंत्र्य सैनिकांनी योगदान दिलेले आहे. स्वातंत्र्यवीर सावरकरांनी हजारो शब्द मराठी भाषेला दिले. महापौर हा शब्द संपूर्ण भारतात वापरला जातो. हा शब्द स्वातंत्र्यवीर सावरकरांनी दिला. अनेकवेळा लोकं विचारतात मराठ टिकेल का? पण आपण प्रतिप्रश्न विचारला पाहीजे की, आपण ती टिकवणार आहोत का? त्यासाठी काही करणार आहोत आक? आपणच आपल्या पुढच्या पिढींना अभिव्यक्तीची भाषा म्हणून मराठी देणार नसू तर भाषा टिकणार कशी? असा सवाल देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित केला. मराठी भाषेला ज्ञानभाषा बनिवण्यासाठी प्रयत्नशील मराठी भाषा विभागाकडून मराठी भाषेसाठी अनेक प्रयत्न होत असतात पण त्याला लोकचळवळीचे स्वरुप प्राप्त झाले पाहीजे. मातृभाषेचा गोडवा ओळखण्याचे काम पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केले. भारतीय भाषा आपल्याला जगवायच्या असतील तर त्यांना ज्ञानभाषेत रुपांतरीत करावे लागेल. उच्च शिक्षण मातृभाषेत मिळणार नाही, तोपर्यंत मातृभाषा वैश्विक होणार नाही. हाराष्ट्राने यात आघाडी घेतली असून इंजिनिअरींग आणि मेडिकलचे शिक्षण मराठीत देणार आहोत. मराठीला ज्ञानभाषा करण्याचे काम आम्ही करणार आहोत, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. या संमेलनासाठी जगभरातील २० देशांमधून मराठी भाषेच्या संवर्धनासाठी काम करणार्या विविध संघटनांचे ४९८ प्रतिनिधी व त्याचप्रमाणे भारतातील विविध शहरांत राहणार्या आणि मराठी भाषेच्या संवर्धनाचे काम करणार्या संस्थांचे सुमारे एक हजार प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिली होती. मराठी संस्कृती व मराठी भाषा याबाबतचे चर्चासत्र, मराठी संस्कृतीचे प्रदर्शन करणारे नाट्यसंगीत, वादन इ. विविध कलांचा अविष्कार त्याचप्रमाणे विविध चर्चासत्रांचे दि. ४ ते दि. ६ जानेवारी २०२३ रोजी आयोजन करण्यात आले आहे.