एकनाथ शिंदे गटाचे प्रवक्ते आणि शिवसेनेचे बंडखोर आमदार दीपक केसरकर यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यामुळेच शिवसेना फुटल्याचा आरोप केल्याने मोठा वाद निर्माण झाला होता. राष्ट्रवादीच्या अनेक नेत्याबरोबरच शिवसेनेनं या प्रकरणावरुन नाराजी व्यक्त करताना केसरकरांवर टीका केली होती. त्यानंतर केसरकरांनी पवार यांची जाहीर माफी मागितली. मात्र आता केसरकर यांनी थेट शरद पवारांच्या मुंबईतील निवासस्थानी आपण त्यांना भेटायला जाण्यास तयार आहोत असंही म्हटलंय. मुंबईमधील पत्रकार परिषदेमध्ये बोलत असताना शरद पवार हे एक महान नेते असल्याचं विधान केसरकर यांनी म्हटलंय.

नक्की वाचा >> “चांगला मुख्यमंत्री कसा असतो हे उद्धव ठाकरेंनी दाखवून दिलं पण बरोबर असणाऱ्या…”; केसरकरांनी काँग्रेस, राष्ट्रवादीवर फोडलं खापर

काय म्हणाले केसरकर
उद्धव ठाकरेंनी पुन्हा एकदा काँग्रेस, राष्ट्रवादीसोबत एकत्र येऊन लढू आणि शिंदे गटाला रोखू असं विधान केल्यावरुन विचारण्यात आलेल्या प्रश्नाला उत्तर देताना आपण पक्षप्रमुखांच्या विधानाच्याविरोधात बोलणार नाही असं केसरकर यांनी सांगितलं. आपण पक्षाच्या धोरणांवर मत मांडू शकतो मात्र नेते हे माझ्यासारख्या कार्यकर्त्यांपेक्षा मोठे असतात. त्यामुळे त्यांच्याबद्दल किंवा त्यांना वाईट वाटेल असं मी काहीही बोलणार नाही, असं केसरकर यांनी स्पष्ट केलं. याचवेळी त्यांनी आपण उद्धव ठाकरेंपेक्षा शरद पवारांच्या नेतृत्वाखाली अधिक काम केल्याचं सांगतानाच त्यांच्याबद्दल काही दिवसांपूर्वी केलेल्या विधानाच्या पार्श्वभूमीवर माफीही मागितल्याचं नमूद केलं.

नक्की पाहा >> Photos: सोमय्यांनंतर शिंदे गटाकडून नारायण राणे आणि त्यांच्या पुत्रांना थेट इशारा; म्हणाले, “उद्धव ठाकरे, ‘मातोश्री’वर…”

नेमका प्रश्न काय होता?
काल (१५ जुलै) शिवसैनिकांसमोर बोलताना उद्धव ठाकरेंनी गरज पडली तर पुन्हा शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी एकत्र निवडणुका लढवतील आणि शिंदे गटातील आमदारांना विधानसभेमध्ये जाण्यापासून रोखतील. गरज पडल्यास महापालिका आणि नगरपालिका निवडणुकींसाठीही एकत्र लढू असं ते म्हणाले. कार्यकर्त्यांनी यासाठी तयार रहावं असं सांगण्यात आलं आहे, यावर आपलं काय मत आहे असं सांगत प्रश्न विचारण्यात आला.

नक्की वाचा >> “त्यात केसरकरांचा नंबर सगळ्यात वर”; शरद पवारांनी शिवसेना फोडल्याचा आरोप, राणेंसोबतच्या वादावरुन शिवसेनेचा टोला

या प्रश्नावर केसरकर काय म्हणाले?
“पक्षप्रमुख जे बोलतात त्याविरोधात बोलणं हे माझ्यासारख्या छोट्या कार्यकर्त्याला शोभणारं नाहीय. मात्र एक गोष्ट मी कायम सांगू इच्छितो की आम्ही बाळासाहेबांची विचारसरणी मानणारे आहोत. बाळासाहेबांनी सांगितलं होतं की मी शेवटचा व्यक्ती असेल तरी काँग्रेसशी जुळवून घेणार नाही. काँग्रेससोबत कधीच जाणार नाही. मी माझी विचारधार पुढे घेऊन जाईल. मी भगवा झेंडा घेऊनच वाटलाच करेन, असं ते म्हणाले होते. आम्ही त्यांच्याच विचारांवर चालतोय. पक्षप्रमुख फार मोठे आहेत. ते काहीही बोलू शकतात. मात्र ती बाळासाहेबांची विचारसणी आहे की नाही यावर मी भाष्य करु शकतो. मी पक्षप्रमुखांच्या वक्तव्याविरोधात बोलू इच्छित नाही,” असं केसरकर म्हणाले.

नक्की वाचा >> त्या ४० जणांना मनसेमध्ये सामावून घेण्यासाठी राज-फडणवीस भेट? NCP ने शंका उपस्थित करत म्हटलं, “मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या…”

पवारांचाही केला उल्लेख
पुढे बोलताना, “आम्ही आधीपासूनच सांगतोय की आम्ही बाळासाहेबांच्या विचारांवर चालतोय. मोदी सध्या जे नेतृत्व करत आहेत त्याचं कौतुक जगभरामध्ये होतंय. त्यामुळे त्यांचाही आशिर्वादही या सरकारला आहे. महाराष्ट्राला पुढे घेऊन जायचं आहे. मी काही विरोधी वक्तव्य केलं तर पक्षप्रमुखांनाही वाईट वाटेल. माझ्यावर प्रेम करणारा कार्यकर्ता असं कसं बोलला असं त्यांना वाटू शकतं. मी उद्धव ठाकरेंच्या मार्गदर्शनामध्ये जेवढं काम केलंय त्याहून अधिक काम पवारांच्या मार्गदर्शनाखाली केलंय. मी हे जेव्हा बोलतो तेव्हा त्यांच्यावर टीका करण्यासाठी बोलत नाही. मला त्यांच्याबद्दल फार आदर आणि प्रेम आहे,” असं केसरकर म्हणाले.

नक्की वाचा >> …अन् देवेंद्र फडणवीस हसून म्हणाले, “…म्हणून आज दोन माईक ठेवलेत आणि कुठलीही चिठ्ठी नाही”; सभागृहात पिकला एकच हशा

पवार महान नेते
“एकदा (शरद पवार) मुख्यमंत्र्यांसोबत डिनरला भेटले होते, तेव्हा कोकणासाठी सर्वांनी राजकारण बाजूला ठेवून एकत्र येऊन काम केलं पाहिजे, असं ते म्हणाले होते. ते महान नेते आहेत. आपण त्यांच्या पक्षाच्या धोरणांबद्दल बोलतो तेव्हा त्यांचं नाव घेणं अनिवार्य होतं, कारण ते पक्षाचे प्रमुख आहेत. त्यामुळेच मी असं ठरवलंय की पवारांशी संबंधित काही असेल तर त्यावर मी वक्तव्य करणार नाही. मी त्यांना गुरुस्थानी मानतो. त्यामुळे मी त्यांची जाहीर माफी मागितली आहे,” अशी आठवण केसरकरांनी करुन दिली.

नक्की पाहा >> Photos: दिल्लीतही शिंदे गट? भाजपा अजून एका ‘मास्टरस्ट्रोक’च्या तयारीत; केसरकर म्हणाले “…तेव्हा उद्धव ठाकरेसुद्धा ऐकतील”

…तर मी स्वत: सिलव्हर ओकवरही जायला तयार
“त्यांचं (शरद पवारांचं) मन दुखावलं असेल तर मी स्वत: ‘सिल्व्हर ओक’वरही जायला तयार आहे. कारण छोट्या कार्यकर्त्यांनी विनम्र राहिलं पाहिजे. नेते मंडळी ही कार्यकर्त्यांपेक्षा मोठी असतात. काही निर्णय ते परिस्थितीनुसार घेतात. त्यामुळे जेव्हा परिस्थिती सामान्य होते मात्र ते निर्णय इतिहासाचा भाग होतात. जसं २०१४ मध्ये राष्ट्रवादीने भाजपाला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला. मात्र त्यामुळे शिवसेना दुसऱ्या क्रमांकावर आली. खरं तर ते भाजपाच्या तुलनेनं बरोबरीत होते. असे काही निर्णय होतात तेव्हा आम्ही त्या निर्णयांबद्दल बोलतो व्यकीबद्दल बोलत नाही,” असं केसरकर यांनी स्पष्ट केलं.

नक्की वाचा >> राज ठाकरे – फडणवीस भेटीदरम्यान उपस्थित असणाऱ्या नांदगावकरांचं युतीसंदर्भात सूचक विधान; म्हणाले, “पवार साहेबांनी…”

यापूर्वी केसरकर काय म्हणाले होते त्यावरुन वाद झालेला
“मी राष्ट्रवादीत होतो, त्यावेळी त्यांनी अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. त्यांचं वैशिष्ट्य म्हणजे महाराष्ट्रात जेव्हा जेव्हा शिवसेना फुटली तेव्हा त्यामागे शरद पवार होते ही वस्तुस्थिती आहे. आपण प्रत्येक गोष्टीचे साक्षीदार आहोत. मी राष्ट्रवादीत असताना ते विश्वासात घेऊन सांगायचे”, असं केसरकरांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितलं. तसेच पुढे बोलताना, “शरद पवारांनीच मला, जरी मी नारायण राणेंना बाहेर पडण्यासाठी मदत केली असली तरी कोणत्या पक्षात जावं याची अट ठेवलेली नाही असं सांगितलं होतं. हा निश्चितच त्यांच्या मनाचा मोठेपणा आहे. पण याचा अर्थ नारायण राणे यांना शिवसेनेतून बाहेर पडण्यासाठी शरद पवारांनीच मदत केली होती,” असंही केसरकर म्हणालेत.

नक्की पाहा >> Photos: २०२० मध्ये शिंदेंचाच होता विरोध अन् काल मुख्यमंत्री म्हणून त्यांनीच केली ‘या’ निर्णयाची घोषणा; BJP ला होणार मोठा फायदा

“त्यांनी शिवसेना का फोडली? बाळासाहेब जिवंत होते तेव्हा त्यांना यातना का दिल्या? याचं उत्तरही त्यांनी महाराष्ट्राच्या जनतेला दिलं पाहिजे. ‘मातोश्री’ कधी ‘सिल्व्हर ओक’च्या दारी गेल्याचं मी ऐकलेलं नाही. आपला पक्ष मोठा व्हावा, तो सत्तेत असावा ही शरद पवारांची इच्छा असणं स्वाभाविक आहे. पण बाळासाहेबांना हे कधीही मान्य नव्हतं,” असंही केसरकर म्हणाले.