राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार झाल्यानंतर शिंदे गटातील शपथ घेतलेले सर्व मंत्री दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतीस्थळी पोहोचले. मंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर कामाला सुरुवात करण्यापूर्वी बाळासाहेबांचे आशीर्वाद घेण्यासाठी आपण येथे आल्याचं आमदारांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितलं आहे. यावेळी बोलताना शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी संजय राठोड यांच्यावरील आरोप अपरिपक्व असल्याचे म्हटले आहे. तसेच संजय राठोड ज्या समाजातून येतात, त्या समाजी मागणी असल्याने त्यांना मंत्रीपद दिले असल्याचेही ते म्हणाले.

हेही वाचा – मंत्रीपद मिळताच संजय राठोड यांचा चित्रा वाघ यांना इशारा; म्हणाले “मी आतापर्यंत शांत होतो, पण आता…”

काय म्हणाले दीपक केसरकर?

संजय राठोड ज्या समाजातून येतात, त्यांच्या आशा-आकांशांचं प्रतिनिधित्व ते करतात. अशा वेळेला त्यांच्या समाजाचीही मागणी होती, की त्यांच्यावर आरोप सिद्ध झाले नसताना त्यांना मंत्रीपद दिलं जात नसेल तर त्यांच्या समाजावर अन्याय आहे, अशी प्रतिक्रिया शिंदे गटाचे प्रवक्ते दिपक केसरकर यांनी दिली.

संजय राठोड मंत्री झाल्यानंतर या तपासात कोणतीही अडचण निर्माण होणार नाही. तसेच या प्रकरणात त्यांचा कोणताही सहभाग असल्याचे दिसत नाही. त्यांचा सहभाग असल्याचे सिद्ध झाले तर कारवाई करता आली असती. त्यामुळे हे आरोपच अपरिपक्व आहे, असेही ते म्हणाले.

हेही वाचा – मुख्यमंत्री शिंदे रात्री ‘वर्षा’ बंगल्यावर पोहोचले; बंगल्यातून बाहेर पडताना पत्रकारांनी प्रश्न विचारल्यावर म्हणाले, “अरे बाबा…”

गेल्या महिन्याभरापासून प्रलंबित असलेला राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार अखेर मंगळवारी राजभवनावर हा शपथविधी पार पडला. पहिल्या टप्प्यात शिंदे गट आणि भाजपाकडून प्रत्येकी नऊ अशा एकूण १८ मंत्र्यांचा मंत्रिमंडळात समावेश करण्यात आला आहे. शिंदे गटाकडून तानाजी सावंत, उदय सामंत, संदीपान भुमरे, दादा भुसे, अब्दुल सत्तार, दीपक केसरकर, शंभूराज देसाई, संजय राठोड, गुलाबराव पाटील यांना मंत्रिमंडळात स्थान मिळालं आहे. आपल्या मंत्रीपदाचा कार्यभार स्वीकारण्यापूर्वी या मंत्र्यांनी शिवाजी पार्क येथील बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळी जाऊन त्यांना अभिवादन केले.