राज्यात नवे सरकार स्थापन होऊन महिन्याच्यावर कालावधी लोटून गेला आहे. मात्र, अद्यापही मंत्रिमंडळ विस्तार झालेला नाही. यावरून विरोधकांकडून टीका होत असताना, याबाबत शिंदे गटाकडून प्रतिक्रिया देण्यात आली आली आहे. शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी येत्या रविवारपर्यंत राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार होईल, अशी माहिती दिली आहे.

नेमकं काय म्हणाले दीपक केसरकर?

”येत्या रविवारपर्यंत राज्यमंत्रिमंडळाचा विस्तार होईल. नेमका कधी होईल याबाबत मुख्यमंत्री सांगतील. तो त्यांचा अधिकार आहे. याबाबत मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आपापसात चर्चा करतील आणि मंत्रिेमंडळ विस्ताराची नेमकी तारीख सांगण्यात येईल. मात्र, कोणत्याही परिस्थिती येत्या चार दिवसात मंत्रिमंडळ विस्तार होईल. त्यापेक्षा जास्त वेळ होणार नाही”, असे दीपक केसरकर म्हणाले.

हेही वाचा – मोठी बातमी! नॅशनल हेराल्ड आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी ईडीची मोठी कारवाई, ‘यंग इंडियन’ कार्यालयाला ठोकले टाळे

मंत्रिमंडळ विस्तारावरून विरोधकांची टीका –

रखडलेल्या मंत्रिमंडळ विस्तारावरून विरोधकांकडून सातत्याने टीका होते आहे. ”घटनेनुसार नव्या सरकारच्या स्थापनेनंतर मंत्रिमंडळाचा विस्तार होणे बंधनकारक आहे. अद्याप हा विस्तार झाला नसून हे सरकार घटनाबाह्य आहे”, असा आरोप नाना पटोलेंनी केला आहे, तर विरोधी पक्षनेते अजित पवार यांनीही मंत्रिमंडळ विस्तारवरून राज्य सरकारवर खोचक टीका केली आहे. “कॅबिनेटमध्ये ४५ खुर्च्या असतात, त्याच्यात ते दोघे पूर्णपणे चर्चा करतात. बाकीच्या सगळ्या खुर्च्या त्यांच्याकडे बघत असतात, हे दोघं काय करता काय नाही,”, असं ते म्हणाले.