वाई : महाबळेश्वरला येणारे पर्यटकांचे घाटातील धबधब्यावर सुरू असलेले पर्यटन पर्यटकांसाठी हे धोकादायक ठरू शकते. त्यामुळे पर्यटकांना धबधब्यावर थांबण्यास बंदी घालण्याची मागणी सार्वजनिक बांधकाम विभागाने महाबळेश्वरच्या तहसीलदार व पोलिसांकडे केली आहे.

   मागील आठवड्यापासून महाबळेश्वर तालुक्यात मुसळधार पाऊस सुरू आहे. यामुळे घाटातील धबधबे ओसंडून वाहत आहेत. अनेक ठिकाणी दरडी कोसळण्याच्या घटना देखील घडल्या आहेत. सध्या वर्षा सहलीसाठी आलेले पर्यटक हे आवर्जून घाटातील धबधब्यावर थांबून वर्षा सहलीचा आनंद लुटताना दिसत आहेत. परंतु मुसळधार पाऊस सुरू असताना असे पर्यटन हे धोकादाय ठरू शकते. मुसळधार पावसामुळे अनेक धबधब्यावरून पाण्याबरोबर दगड धोंडे खाली येत आहेत. हे दगड, धोंडे, झाडे,लाकडाचे वाळके तुकडे धबधब्यावर पावसात भिजत असलेल्या पर्यटकांच्या जीवावर भेटू शकतात. त्यामुळे या गंभीर पर्यटनाची येथील सार्वजनिक बांधकाम विभागाने दखल घेतली असून त्यांनी या पर्यटनाबाबत तहसीलदारांकडे तक्रार केली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता महेश गोंजारी यांनी तहसीलदार सुषमा चौधरी पाटील यांना याबाबत पत्र पाठवून त्यासोबत पर्यटन धबधब्यावर आंघोळ करत असल्याचे फोटो त्यांनी जोडले आहेत. अशा पर्यटनामुळे पर्यटकांच्या जीवाला धोका होऊ शकतो. काही दिवस अशा पर्यटनाबाबत गांभीर्याने विचार होऊन येथे थांबण्यास पर्यटकांना मनाई करावी अशी मागणी त्यांनी केली आहे. या निवेदनाच्या प्रती वाईचे प्रांताधिकारी राजेंद्र कुमार जाधव, वनक्षेत्रपाल श्रीकांत कुलकर्णी व पोलीस निरीक्षक संदीप भागवत यांना देण्यात आल्या आहेत.