केंद्रीय तपास यंत्रणांच्या छापेमारीनंतर ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’वर (पीएफआय) केंद्र सरकारने बंदी घातली आहे. पीएफआयच्या माध्यमातून देशात दुष्प्रचार सुरू होता. या संघटनेच्या निशाण्यावर काही लोक होते, देशात हल्ले करण्याचा त्यांचा कट होता, अशी माहिती या कारवाईनंतर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. पीएफआय ‘सायलेंट किलर’ असल्याचेही फडणवीस म्हणाले आहेत.

“…म्हणून अशा लोकांचा बंदोबस्त केला पाहिजे”, एकनाथ शिंदेंचं नाशिकमध्ये वक्तव्य

“पीएफआयविरोधात मोठ्या प्रमाणात पुरावे उपलब्ध आहेत. देशात गैरकृत्य करण्यासाठी या संघटनेने आर्थिक यंत्रणा तयार केली होती. खूप मोठ्या प्रमाणात बँक खाती उघडायची आणि या खात्यांमध्ये कुणाला संशय येऊ नये, यासाठी थोडे पैसे जमा करायचे”, असा प्रकार या संघटनेकडून करण्यात येत असल्याची माहिती फडणवीस यांनी दिली आहे. पीएफआयवर घातलेल्या बंदीसंदर्भात लवकरच राज्यांना अधिसूचना जारी करण्यात येणार आहे. यानुसार पीएफआय आणि संबंधित सहा संघटनांवर कारवाई करू, असे फडणवीस यांनी सांगितले आहे.

विश्लेषण : ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’वर का कारवाई?

‘सिमी’ या अतिरेकी संघटनेवर बंदी घालण्यात आल्यानंतर काही लोकांनी एकत्र येत पीएफआयसारखी संघटना काढली आहे. देशातील लष्कर आणि गुप्तचर यंत्रणांच्या सतर्कतेमुळे देशविघातक तत्वांनी ही नवी पद्धत शोधून काढली आहे, असे फडणवीस म्हणाले आहेत. देशातील उत्तर-पूर्व भागात मशीद तोडल्याच्या खोट्या प्रचारानंतर राज्यात तीव्र आंदोलन आणि तोडफोड करण्यात आली होती. पीएफआयकडून अशाचप्रकारचे कृत्य केले जात होते, अशी माहिती फडणवीस यांनी दिली आहे.