कराड : करोना विषाणूच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेचा साठावा वर्धापनदिन अर्थात ‘हीरक महोत्सवी महाराष्ट्र दिन’ येत्या शुक्रवारी (१ मे) साधेपणानेच साजरा होत आहे. संयुक्त सातारा जिल्ह्याचे सुपुत्र व राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी १ मे १९६० रोजी महाराष्ट्र स्थापनेचा मंगल कलश आणला होता. या पार्श्वभूमीवर सातारकर जनतेला या ऐतिहासिक दिवसाचे मोठे कुतूहल आहे. संयुक्त महाराष्ट्राच्या लढय़ात १०५ हुतात्म्यांचे बलिदान गेल्याने महाराष्ट्रातील जनता याकडे जिव्हाळय़ाने व भावनिकदृष्टय़ा पाहात आली आहे. त्यावेळी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्याकडून संयुक्त महाराष्ट्र निर्मितीचा निर्णय करून घेण्यात यशवंतराव चव्हाण यशस्वी झाले होते. दिल्लीश्वरांची मान्यता मिळाल्याने १ मे १९६० रोजी महाराष्ट्राची स्थापना झाली. त्यावेळच्या ऐतिहासिक कार्यक्रमात यशवंतराव चव्हाणांनी महाराष्ट्र स्थापनेचा मंगल कलश आणून त्याचे पूजन केले होते. अशा या ऐतिहासिक क्षणाचा येत्या शुक्रवारी (१ मे) हीरक महोत्सव असूनही महाराष्ट्र दिन म्हणून दरवर्षी दिमाखात साजरा होणारा हा दिवस सध्या करोना विषाणूच्या ग्रहणामुळे अतिशय साधेपणानेच साजरा होत आहे. महाराष्ट्र दिनानिमित्त सातारा जिल्ह्याततील मुख्य जिल्हाधिकारी कार्यालयात शुक्रवारी सकाळी ८ वाजता ध्वजारोहण होणार असल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी सुनील थोरवे यांनी दिली आहे. पालकमंत्री बाळासाहेब पाटील, जिल्हाधिकारी शेखर सिंह, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय भागवत, पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते हे महाराष्ट्र दिनाच्या कार्यक्रमास उपस्थित राहणार आहेत.